मुंबईः मुंबई-गोवा राष्ट्रीय मार्गावरील चिपळूण जवळील परशुराम घाट चौपदरीकरणासाठी 7 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. येत्या पावसाळ्यात वाहनचालकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी घाटात युद्धपातळीवर काम सुरू आहे. परशुराम घाटात अवघड ठिकाणी काम करावे लागणार असल्याने हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्याची मागणी या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. त्यावर पुढील 2 ते 3 दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून जिल्हाधिकार्यांना एक पत्र देण्यात आले आहे. या पत्रात २७ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत दु. १२.०० संध्याकाळी ६.०० वाहतुकीसाठी परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. या कालावधीत हलक्या वाहनांची वाहतूक चीरणी आंबडस चिपळूण या पर्यायी मार्गे वळवण्यात यावी अशी विनंती पेण रायगड विभागाच्या राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून रत्नागिरीच्या जिल्हाधिकार्यांकडे १७ मार्च रोजीच्या पत्राद्वारे करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने पोलीस प्रशासन, उपप्रादेशिक विभाग आणि चिपळूण महसूल विभाग यांच्याकडून अहवाल मागवला आहे. हा अहवाल आल्यानंतर घाट नेमका कोणत्या दिवशी व किती वेळ कसा बंद करायचा याबाबत निर्णय घेण्यात येईल.