सरकारविरोधात जनतेने निवडणुकीत राग व्यक्त करावा : राज ठाकरे

सरकारविरोधात जनतेने निवडणुकीत राग व्यक्त करावा : राज ठाकरे

नाशिक : लोकांच्या हितासाठी तुम्हाला हे राज्य दिले आहे. मात्र, जनतेच्या प्रश्नावर कोणी बोलायला तयार नाही. आज आरोग्य विभाग असो अथवा म्हाडाच्या परीक्षेच्या पेपरफुटीचा प्रकार या सर्व प्रकाराबाबत जनतेेने आता या सरकारला निवडणुकीतून धडा शिकवायला हवा, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्य सरकारवर भडकले.

नाशिक दौर्‍यावर आले असता राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना पेपरफुटीबाबत सवाल करण्यात आला. ते म्हणाले, पाच वर्षे लोक सरकारविषयी तक्रारी करतात. मग तो खड्ड्यांचा प्रश्न असो की, अन्य कोणताही प्रश्न. पाच वर्षे यावर ओरड केली जाते. पण निवडणुका आल्या की, लोक भलत्याच लोकांना मतदान करतात. त्यावेळी कुठे जातात तुमचे प्रश्न? त्यामुळे मला असे वाटते की, आता जनतेने या सरकारला शासन करण्याची गरज आहे. लोकांच्या हितासाठी तुम्हाला हे राज्य दिलयं याची जाणीव त्यांना करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. वाढत्या बेरोजगारीबाबत बोलतांना त्यांनी केवळ सुशिक्षित असून उपयोग नाही, तर सुज्ञही असायला हवे. सरकार जनतेला गृहीत धरतयं त्यांचा हा गैरसमज दुर करण्यासाठी निवडणुकीतून सरकारविरोधातील राग व्यक्त करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

कोविडचे नियमांबाबत सोयीस्कर भूमिका
राज ठाकरे म्हणाले की, कोविडच्या नावाखाली यांना सूट, त्यांना नाही असे सुरू आहे. थिएटरमध्ये मास्क लावायचा नाही. एक खुर्ची मोकळी सोडायची. मग हेच नियम रेस्टॉरंटला लागू नाहीत. त्यामुळे थिएटरमध्ये मास्क लावल्यामुळे अनेकांचे प्रॉब्लेम झाले, असा चिमटाही त्यांनी यावेळी काढला. याप्रसंगी त्यांनी आचारसंहितेच्या नियम पालनाचा किस्सा सांगितला. 95 मध्ये निवडणूक आचारसंहिता आणली. तिचे नियमही लोकांना स्पष्ट माहित नव्हते. त्यामुळे एक कॅमेरावाला माझ्या मागे लागला. तेव्हा त्याला मी बाथरूमला चाललोय हे सांगावे लागले, असे म्हणताच पत्रकार परिषदेत खसखस पिकली.

First Published on: December 14, 2021 8:10 AM
Exit mobile version