Politics : …म्हणून मोदी, फडणवीस, अमित शहा छातीचा फुगा फुगवून चालतात; ठाकरे गटाचा घणाघात

Politics : …म्हणून मोदी, फडणवीस, अमित शहा छातीचा फुगा फुगवून चालतात; ठाकरे गटाचा घणाघात

मुंबई : भाजपाकडे लोकांना घाबरवण्याची, दहशत निर्माण करण्याची यंत्रणा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हाती ईडी, सीबीआय, पोलीस आहेत म्हणून ते छातीचा फुगा फुगवून चालतात आणि बोलतात. प्रत्यक्षात त्यांची छाती म्हणजे माचीसचा रिकामा खोका आहे, असा घणाघात ठाकरे गटाने केला आहे.

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास मंडळ म्हणजे नाबार्डने 2011मध्ये शिखर बँकेतील या व्यवहाराची चौकशी करून बँकेला 144 कोटी रुपयांचा तोटा झाल्याचा ठपका ठेवला होता. सर्व नियम धाब्यावर बसवून सहकारी साखर कारखाने विक्रीस काढले आणि सूत गिरण्यांना मनमानी पद्धतीने कर्जवाटप करून बँकेला तोट्यात आणले, असा ठपका बँकेच्या संचालक मंडळावर ठेवण्यात आला होता, असे सामना दैनिकातील अग्रलेखात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने म्हटले आहे.

‘जरंडेश्वर कारखान्यात घोटाळा झाला असून अजित पवार यांना ‘हिसाब’ द्यावाच लागेल,’ अशी या किरीट सोमय्या यांची ईर्षा होती. त्यामुळे जरंडेश्वर साखर कारखान्याचा मुद्दा मुलुंडचा पोपटलाल किरीट सोमय्या याने उजेडात आणला होता. तपास यंत्रणांचा वापर करून आपल्या राजकीय विरोधकांना जेरीस आणायचे आणि हे लोक भाजपामध्ये आले की, त्यांना त्याच तपास यंत्रणांकडून ‘क्लीन चिट’ द्यायला लावायची. किरीट सोमय्या यांनी आता अजित पवार यांचा नागरी सत्कार भाजपाच्या मुख्यालयात केला पाहिजे, असा टोला या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

खोटे आरोप करणाऱ्या या किरीट सोमय्या यांनाच कोर्टात खेचायला हवे आणि ते काम अजित पवार यांच्या स्वाभिमानी कुटुंबाने करायचे आहे. मोदी आणि त्यांचे लोक एकतर खोटेच खोटे बोलतात किंवा भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देऊन देश लुटणाऱ्यांच्या टोळीशी भागीदारी करतात. अजित पवार हे घाबरले नसते आणि हिमतीने काम केले असते तर त्यांचा बालही बांका झाला नसता, असा दावाही ठाकरे गटाने केला आहे.

एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोकही अशाच भीतीपोटी पळून गेले. त्यांना चौकश्या तसेच अटकेची भीती दाखवली गेली आणइ त्यांच्या कमरेवरचे वस्त्र ओले झाले. शिंदे म्हणतात, ठाकरे यांचे सरकार फडणवीस, दरेकर, गिरीश महाजन, लाड वगैरे लोकांना अटक करणार होते. हे सर्व सांगत बसण्यापेक्षा फडणवीस यांचे सरकार शिंदे यांच्या अटकेची का तयारी करत होते आणि अटक टाळण्यासाठी घाबरगुंडी उडालेले आपण स्वतः कसे पळून गेलो आणि भाजपाच्या गोठ्यात सामील झालो, हे त्यांनी स्पष्ट करायला हवे, असे ठाकरे गटाने सुनावले आहे.

फडणवीस आणि त्यांच्या टोळीवर भ्रष्टाचारासह बेकायदेशीर फोन टॅपिंगचे आरोप होते. चौकशीत तसे पुरावे समोर आले. ज्या गुन्हे शाखेने अजित पवार यांच्या घोटाळ्याची आधी चौकशी केली आणि आता क्लीन चिट दिली, त्याच तपास यंत्रणेने हा तपास केला, पण सत्तेवर येताच हे सर्व तपास फडणवीस यांनी थांबवले आणि गुन्हेच रद्द केले. स्वतःच स्वतःला आणि आपल्या टोळीला क्लीन चिट देऊन मोकळे झाले. आता अजित पवार यांनाही स्वच्छ करून घेतले, अशी टीका करतानाच, अजित पवार यांना क्लीन चिट दिल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ आणि मानाचा ताम्रपट देण्याचा सोहळा फडणवीस यांनी आयोजित करावा, असा टोला ठाकरे गटाने केला आहे.

हेही वाचा – Ajit Pawar : …म्हणून भाजपाने अजित पवारांना घोटाळ्यातून मुक्त केले, ठाकरे गटाचा हल्लाबोल


Edited by Manoj S. Joshi

First Published on: April 26, 2024 4:22 PM
Exit mobile version