कोकणाच्या वाटेवर खड्ड्यांचे विघ्न, गणपतीसाठी निघालेले चाकरमानी हैराण

कोकणाच्या वाटेवर खड्ड्यांचे विघ्न, गणपतीसाठी निघालेले चाकरमानी हैराण

कोकणाच्या वाटेवर खड्ड्यांचे विघ्न, गणपतीसाठी निघालेले चाकरमानी हैराण

गणरायाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस उरल्याने चाकरमान्यांना वेध लागलेत ते कोकणाचे. यामुळे मिळेल त्या वाहनाने कोकणवासिय गावाकडे निघाले आहेत. पण दरवर्षाप्रमाणेच याहीवर्षी मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचे विघ्न निर्माण झाल्याने कोकणवासीयांची वाट मात्र बिकट झाली आहे.

रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यामधून प्रामुख्याने हा महामार्ग जातो आणि नंतर तो सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करतो. सध्या रायगड रत्नागिरी चे खासदार सुनील तटकरे आहेत. याआधी तब्बल  सहा टर्म येथील मतदारसंघातून खासदार म्हणून शिवसेनेचे अनंत गीते निवडून आले आहेत, त्यातील अनेक वर्षे त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात पद भूषविलेले आहे , शिवाय शहरी आणि ग्रामीण विकास समितीच्या अध्यक्षपदी  देखील ते  राहिलेले  आहेत , मात्र एवढे सगळे पदरी पडून देखील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनंत गीते यांनी या महामार्गाच्या पुर्णत्वासाठी किती काम केले याबाबत कोकणवासियांची नाराजी आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ,  पूर्वीचा राजापूर मतदारसंघातून देखील १९९६ ते २००८ सुरेश प्रभू ,(मधली टर्म काँग्रेसमधून निवडून आलेले खासदार निलेश राणे) आणि २०१४ पासून ते आजतागायत विनायक राऊत हे शिवसेनेचेचं लोकप्रतिनिधी वर्षानुवर्षे निवडून येत आहेत , म्हणजेच केवळ गीते यांच्याच मतदारसंघातूनच नव्हे तर संपूर्ण कोकणातूनच शिवसेनेला  सातत्याने  भरभरून मतदान झालेले आहे. मात्र या दोन्ही मतदारसंघात ,संपूर्ण मुंबई गोवा महामार्ग जिथून जातो तिथे या  महामार्गाची अवस्था अत्यंत बिकट आहे.

ज्या विक्रमी वेळात मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचे काम याच शासनाने पुर्ण करायला घेतले आहे , तो उत्साह , तो वेग , ती आत्मियता मुंबई गोवा महामार्गाचे काम करताना या शासनाकडून कोकणवासीयांना का दिसत नाही , केवळ निवडणूका जवळ आल्या की कोकण आपला बालेकिल्ला आहे याची आठवण शिवसेनेला होते का ,  हा प्रश्न या महामार्गावर प्रवास करणाऱ्या आणि राजकीय भान असणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला सतावत आहे..

केंद्रीय मंत्रिमंडळात आता कोकणवासीय नारायण राणे यांची वर्णी लागली आहे. राणे त्यांच्या धडाकेबाज कामकाजासाठी ते मुख्यमंत्री होते तेव्हापासून ओळखले जातात. आता किमान त्यांनी तरी या महामार्गाच्या पाठी लागलेली साडेसाती सोडवावी अशी माफक अपेक्षा कोकणवासीय करत आहेत.

मुंबई गोवा महामार्ग हा मागील १४ वर्ष दुरुस्तीकामासाठी आणि सिंमेंट कॉक्रिटकरणासाठी कामकाज सुरू आहे. सध्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी हे वारंवार नवीन डेडलाईन देत असतात मात्र रायगड ते रत्नागिरी हा प्रवास चाकरमान्यांसाठी जिवघेणा असून याबाबत सर्व स्तरातून नाराजी व्यक्त होत आहे.

First Published on: September 6, 2021 5:06 PM
Exit mobile version