उद्धव ठाकरे यांच्यावर प्रसाद लाड यांची टीका, म्हणाले…

उद्धव ठाकरे यांच्यावर प्रसाद लाड यांची टीका, म्हणाले…

 

मुंबईः माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्त्व सोडले आहे. ठाकरे हे हिंदुत्त्वाच्या विरोधात जाऊन राजकरण करत आहेत. त्यांनी केवळ एमआयएमसोबत युती करणं बाकी आहे, असा आरोप भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी रविवारी केला.

ते म्हणाले, महाराष्ट्रासह देशभरात लव्ह जिहादच्या अनेक घटना समोर येत आहेत. बेकायदेशीर धर्मांतर होत आहे. हे प्रकार रोखण्यासाठी कठोर कायदा करण्याची गरज आहे. या मागणीसाठीच सकल हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाद्वारे भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी आम्ही करत आहोत.

यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले, सर्व हिंदुंनी एकत्र येऊन काढलेला हा मोर्चा ऐतिहासिक आहे. मुंबईतून हिंदुंना हद्दपार करण्याचा डाव आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठीच हा मोर्चा काढण्यात आला होता. गेली तीन वर्षे हिंदुंवर अन्याय सुरु आहे. त्याला या मोर्चातून उत्तर मिळाले आहे.

महाराष्ट्रात लव्ह जिहाद कायदा करण्यासाठी रविवारी मुंबईत सकल हिंदू समाजाचा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शिवाजी पार्क येथून हा मोर्चा निघाला. या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. या मोर्चात भाजप नेते आशिष शेलार, खासदार मनोज कोटक, किरीट सोमय्या, चित्रा वाघ, आमदार नितेश राणे, आमदार सदा सरवणकर, आमदार प्रसाद लाड, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, केशव उपाध्ये, खासदार गोपाळ शेट्टी, वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह शेकडो भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते, यासह मोर्चात मोठ्या संख्येने महिला देखील सहभागी झाल्या होत्या.

यावेळी मोर्चेकरींनी मोठ्याप्रमाणात नारीशक्तीच्या देखील घोषणा दिल्या. या मोर्चाचं नेतृत्व महिलांनी केले. जो हिंदू हित का काम करेगा, वही देश पे राज करेगा, गर्व से कहो हिंदू है अशाप्रकारच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. हातात भगवे झेंडे, अंगात भगवे कपडे घालून हजारो लोक शिवाजी पार्कात एकवटले होते. मोर्चेकऱ्यांच्या हातात भूमी रक्षा, राष्ट्र सुरक्षा असे लिहिलेले फलक होते.

First Published on: January 29, 2023 4:34 PM
Exit mobile version