पंतप्रधान मोदी सूडाचं राजकारण करतात; शरद पवारांचा आरोप

पंतप्रधान मोदी सूडाचं राजकारण करतात; शरद पवारांचा आरोप

शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मॅरेथॉन मुलाखतीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अनेक खुलासे केले आहेत. शिवाय त्यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्यावर आरोप केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सूडाचं राजकारण करत असून त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर होत असल्याचं सरळसरळ दिसत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.

सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा तिसरा भाग आज प्रदर्शित झाला. नरेंद्र मोदी सूडाचं राजकारण करतात. फोडाफोडीचं राजकारणही केलं जातंय मध्यप्रदेश हे त्याचं ताजं उदाहरण आहे…असा प्रश्न संजय राऊतांनी पवारांना विचारला. या प्रश्नावर शरद पवार यांनी सविस्तर उत्तर दिलं आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी सूडाचं राजकारण करत आहेत. सत्तेचा गैरवापर करत आहेत हे सरळसरळ दिसतंय. ज्यावेळी मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान होते तेव्हा मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. तसंच काही राज्यांची सत्ता भाजपाकडे होती. मात्र त्यावेळी पंतप्रधान असलेले मनमोहन सिंग यांनी कधीही सूडबुद्धीचं धोरण भाजपाशासित राज्यांच्या बाबतीत स्वीकारलं नाही. त्या काळात ज्यावेळी सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांसोबत बैठक असे त्यावेळी भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक दोन दिवस आधी होत असे. त्या बैठकीत देशाच्या पंतप्रधानांबाबत अत्यंत कठोर शब्दात नरेंद्र मोदी टीका करत असत. याआधी एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री इतक्या कठोर शब्दांत पंतप्रधानांवर टीका करतो हे आम्ही पाहिलं नव्हतं,” असं शरद पवार म्हणाले.

“मनमोहन सरकारमध्ये मी कृषीमंत्री होतो. त्यावेळी गुजरातलाही काही वेळा जाणं झालं. ज्यानंतर काँग्रेसमधल्या काही मंत्र्यांनी माझ्यावर टीका केली, ते म्हणू लागले की मोदी मनमोहन सिंग यांच्यावर एवढी टीका करत आहेत तर भारताचे कृषीमंत्री गुजरातचा दौरा का करतात? त्यावेळी पंतप्रधान असलेल्या मनमोहन सिंग यांनी सांगितलं की गुजरातही आपल्या देशाचा भाग आहे.आपण सगळ्या देशाची हिताची जपणूक करण्यासाठी बसलो आहोत. त्यामुळे शरद पवार जे करत आहेत ते योग्य आहे. हे धोरण कुठे आणि आजचं धोरण कुठे? आज याच्या उलट परिस्थिती आहे. ज्या राज्यात भाजपाची सत्ता नाही तिथे फोडाफोडी करा.. याचं सरकार पाड, त्याचं सरकार पाड. राजस्थानमध्येही काहीतरी प्रयोग सुरु केले आहेत. त्यामुळे मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी या दोघांच्या धोरणात कमालीचा फरक जाणवतो. ” असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवारांनी केलेल्या या आरोपावर भाजप काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

 

First Published on: July 13, 2020 2:15 PM
Exit mobile version