महाडमध्ये एनडीआरएफचा बेस कॅम्प द्या

महाडमध्ये एनडीआरएफचा बेस कॅम्प द्या

कोकणात अतिवृष्टी, पूर, वादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीत बचाव आणि मदतकार्य लवकर सुरू व्हावे, यासाठी महाडमध्ये एनडीआरएफचा बेस कॅम्प उभारावा, अशी मागणी केंद्र आणि राज्य सरकारकडे करण्यात आल्याची माहिती रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी बुधवारी दिली.

एनडीआरएफच्या बेस कॅम्पसाठी महाडमध्ये जागा निश्चित करण्यात आली आहे. एनडीआरएफचा बेस कॅम्प मिळत नसेल तर राज्य सरकारने एसडीआरएफचा कॅम्प देण्याची मागणीही तटकरे यांनी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दरडग्रस्त तळीये गावाला भेट दिली त्यावेळी आपण एनडीआरएफच्या बेस कॅम्पची मागणी केली होती. महाडमध्ये असा बेस कॅम्प झाला तर बचाव आणि मदत कार्याला विलंब होणार नाही. आपत्तीग्रस्तांना तत्काळ मदत मिळू शकेल. तसेच बेस कॅम्पचा फायदा रायगडसह रत्नागिरी, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्याना होणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

तळीयेतील ग्रामस्थांनी जिथे वाडी होती त्याच्या लगत पुनर्वसन करण्याची विनंती केली आहे. मुख्यमंत्र्यांनीही स्थानिक लोकांच्या इच्छेनुसार पुनर्वसन होईल, असे आश्वासन दिल्याचे तटकरे म्हणाल्या. पुनर्वसनाची प्रक्रिया सहा महिन्यात पूर्ण व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

First Published on: July 29, 2021 4:20 AM
Exit mobile version