जी २० परिषदेला सुरुवात, नारायण राणेंनी केले उद्घाटन; पायाभूत सुविधांवर होणार विचारमंथन

जी २० परिषदेला सुरुवात, नारायण राणेंनी केले उद्घाटन; पायाभूत सुविधांवर होणार विचारमंथन

G20 Conference | पुणे – जी २० परिषदेला पुण्यात सुरुवात झाली असून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले. जी २० परिषदेअंतर्गत इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुपची दोन दिवसीय बैठक होणार आहे. पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीच्या मुद्द्यांवर विचारमंथन होणार आहे.

या बैठकीत IWG सदस्य राष्ट्रे, अतिथी राष्ट्रे आणि भारताने आमंत्रित केलेल्या आंतरराष्ट्रीय संस्थांचे ६५ प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या परिषदेचे नारायण राणे यांनी उद्घाटन केले. ते म्हणाले की, मी स्वतःला भाग्यशाली समजतो की ही जी २० आंतरराष्ट्रीय संस्था आहे आणि त्याचे उद्घटान माझ्या हाताने झाले. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देतो. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देश प्रगती करत आहे. जगातील शहरातील विकास कसा होईल, याच्यावर ही परिषद आहे. पुणे, मुंबई, नागपूर ही शहरं जगात आकर्षण ठरत आहेत.


नारायण राणे पुढे म्हणाले की, “शहरांचे स्वरूप कसे असावे याचे मार्गदर्शन या परिषदेमधून मिळेल आणि याला केंद्र सरकार, राज्य सरकार निधी उपलब्ध करुन देतील. तसेच महाराष्ट्र प्रशासनाबद्दल मला अभिमान आहे. सरकार बदलले की निर्णय बदलतात, या मताशी मी सहमत नाही, मी ३२ वर्ष मंत्री होतो, निर्णय बदलत नाहीत तर दृष्टिकोन बदलतो.”

राज्यातील उद्योग बाहेर जात असल्याचे मिस गाईड करणाऱ्या बातम्या आहेत. जे राज्य उद्योगांना करात सवलत देतात त्या राज्यात कंपन्या जातात. देशाच्या इतर भागापेक्षा जागेचे दर महाराष्ट्रात महाग आहेत. त्यामुळे उद्योग महाराष्ट्रातून बाहेर जातात पण ते परत येतात. माझ्याजवळ सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रिपद आहे. उद्योग महाराष्ट्रात आणण्याकरीता केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. रोजगार देण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. २०० कोटीचा ट्रेनिंग प्रोग्राम पुण्यात येईल, असेही नारायण राणे यांनी स्पष्ट केले.

First Published on: January 16, 2023 11:27 AM
Exit mobile version