रिफायनरीचा शिवसेनेला फटका? निवडणुकीत रिफायनरी विरोधी पॅनेल उभं करण्याचा स्थानिकांचा निर्णय

रिफायनरीचा शिवसेनेला फटका? निवडणुकीत रिफायनरी विरोधी पॅनेल उभं करण्याचा स्थानिकांचा निर्णय

कोकणातल्या रिफायनरी प्रकल्पावरुन शिवसेनेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. कारण रिफायनरीच्या मुद्द्यावरुन स्थानिकांनी राजकीय मैदानामध्ये उतरुन धक्का देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये रिफायनरी विरोधी पॅनेल उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

या बैठकीमध्ये रिफायनरीचं समर्थन करणाऱ्या राजकीय नेत्यांना गावामध्ये प्रवेश न देण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेला बालेकिल्ल्यामध्येच धक्का बसण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. राजापूर तालुक्यातील पश्चिम गावांमध्ये रिफायनरी होऊ शकतो. त्यासंदर्भातल्या हालचाली सुरु आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. काही दिवसांपूर्वी या संदर्भातील बातम्या समोर आल्या होत्या. यामध्ये  हा प्रकल्प रत्नागिरीत जिल्ह्यातील राजापूरच्या बारसू सोलगाव परिसरात आणता येईल, असं मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्राद्वारे कळवल्याचं समोर आलं. या सगळ्याच्या घडामोडीवर महाराष्ट्र सरकारच्या या भूमिकेविरोधात राजापूरच्या बारसू सोलगावमधील ग्रामस्थांनी विरोध केला होता.

आता स्थानिकांनी बैठक घेऊन मोठा निर्णय घेतला आहे. त्याचा फटका शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. रविवारी संध्याकाळी झालेल्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये रिफायनरी विरोधी पॅनेल उभं करण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा फटका शिवसेनेला बसू शकतो. राजापूर हा शिवसेनेता बालेकिल्ला राहिला आहे. कायम शिवसेनेसोबत एकनिष्ठ असल्याचा इतिहास आहे. या भागात रिफायनरीला विरोध करत आक्रमक झालेले जवळपास १२ ते १३ हजार मतदार आहेत. १० ते १२ ग्रामपंचायती, २ पंचायत समिती आणि १ जिल्हापरिषद आहे. त्यामुळे स्थानिकांनी घेतलेल्या निर्णयाचा मोठा परिणाम हा शिवसेनेवर होऊ शकतो.

First Published on: April 18, 2022 10:21 AM
Exit mobile version