राजू शेट्टी भाजपसोबत जाणार नाहीत – अशोक चव्हाण

राजू शेट्टी भाजपसोबत जाणार नाहीत – अशोक चव्हाण

(फोटो सौजन्य - Facebook)

गेल्या मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी आपल्याकडून चूक झाली असून चुकीची माणसे सत्तेवर गेली. त्यामुळे शेतकऱ्यांशी त्यांना काही देणेघेणे राहिले नसल्याचे खासदार राजू शेट्टी जाहीरपणे बोलत आहेत. खासदार राहुल गांधी यांचीही त्यांनी भेट घेतली असून आता ते भाजपसोबत जाणार नाहीत, ते निश्चितपणे काँग्रेससोबत येतील असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सोमवारी कराडमधून खटावकडे रवाना झाली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हा विश्वास व्यक्त केला. राजू शेट्टी यांनी खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली. मागील निवडणुकीत भाजप सरकारला पाठिंबा देऊ केलेली चूक त्यांच्या लक्षात आली आहे. हे त्यांनी अनेकदा बोलूनही दाखवली आहे. भाजपला सत्तेवरून पायउतार करणे आवश्यक आहे. आपल्यासोबत ही त्यांनी चर्चा केली आहे. मात्र अद्यापही जागा वाटपाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. मात्र, असे असले तरी राजू शेट्टी भाजपसोबत जाणार नाहीत ते काँग्रेससोबतच येतील असा विश्वास चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी निश्चित

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी निश्चित आहे. राष्ट्रवादीकडून जागा वाटपाचा कोणताही प्रस्ताव अद्याप आपल्याकडे आलेला नाही. मात्र ज्या मतदारसंघात या पक्षाची ताकद जास्त असल्याने त्या पक्षाच्या उमेदवाराला संधी मिळणार आहे. त्यामुळे निश्चित कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे आत्ताच बोलता येणे शक्य नाही.

First Published on: September 3, 2018 6:47 PM
Exit mobile version