“रिपब्लिकन ऐक्य होणार असेल तर मी मंत्रिपद सोडायला तयार आहे. प्रकाश आंबेडकर रिपब्लिकन ऐक्यासाठी तयार असतील तर त्यांनी रिपब्लिकन ऐक्याचे अध्यक्ष व्हावे” असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय रामंज्यत्री ना रामदास आठवले यांनी केले. महाड येथे चवदार तळे सत्याग्रहाच्या ९२ व्या वर्धापन दिनानिमित्त रिपब्लिकन पक्षातर्फे ऐतिहासिक क्रांतिस्तंभ येथे आयोजित जाहीर अभिवादन सभेत ना आठवले बोलत होते. विचारमंचावर आरपीआय रायगड जिल्हा अध्यक्ष जगदीश गायकवाड; स्वागत अध्यक्ष सुमीत मोरे; आरपीआय ( आठवले) चे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर; आमदार भरत गोगावले; डीएम चव्हाण; सिद्धार्थ कासारे; सूर्यकांत वाघमारे; महेंद्र शिर्के; सुमीत वजाळे; चंद्रशेखर कांबळे; प्रावीन मोरे; हेमंत रणपिसे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
काय म्हणाले आठवले
“मी ज्यांच्या सोबत जातो त्या पक्षाची सत्ता येते; त्यांना मुख्यमंत्री पद मिळते. त्या बदल्यात ते मला मंत्रिपद देतात तर बिघडले कुठे? माझ्या हाती आहे झेंडा निळा म्हणून त्यांचा आहे माझ्या मंत्रिपदावर डोळा! माझे मंत्रिपद घालविण्याचा विचार करण्यापेक्षा रिपब्लिकन ऐक्य करून समाजात मंत्रीपद वाढविण्यासाठी रिपब्लिकन ऐक्य करावे असे सांगत मला मंत्रीपदाची फिकीर नाही. समाजात विनाकारण तेढ निर्माण करणे योग्य नाही. मागसावर्गीयांसह सवर्ण सर्व समाज एकत्र आला पाहिजे. भारतीय दलित पँथर च्या शाखा स्थापन करताना मी सांगत होतो की सवर्ण समाजाविरुद्ध दलित पँथर नाही. समाजात समता निर्माण झाली पाहिजे या साठी मी काम करीत असून समाजिक ऐक्यासाठी आपण शिवशक्ती भीमशक्ती एकत्र केली. मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे अशी मी पहिली मागणी केली होती.” – रामदास आठवले