पावसाळा सुरू झाला की वेध लागतात ते पिकनिक आणि ट्रेकिंगचे. धुंदकुंद वातावरणात निसर्गाला जवळून पाहण्याचा योग हा रिमझिम बरसणा-या पावसातच येतो. कैक फुटांच्या उंचीवरून कोसळणारे फेसाळत्या धबधब्याचे पाणी अंगावर झेलण्यासाठी राज्यभरातील पर्यटकांना खुणावत ते म्हणजे कोकण. मात्र अशा धबधब्यांच्या ठिकाणी मुलभूत सुविधांसह अन्य सुविधांचा अभाव असल्याने अनेक वेळा आपत्तींसारख्या दुर्घटनेत मदत आणि निवारण करण्यासाठी बऱ्याच अडचणी येतात. या अडचणी दूर करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटक विभागाने एक पाऊल पुढे टाकले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील धबधबे आता क्लस्टरद्वारे सुरक्षित करण्यात येणार आहे. पर्यटकांच्या सुरक्षेबाबत घेतलेल्या निर्णयाचे पर्यटकांकडून स्वागत केले जात आहे.
सरकारच्या उपाययोजना
रत्नागिरी जिल्ह्यातील धबधब्याच्या ठिकाणी दुर्घटना टाळण्यासाठी धबधब्यांचे क्लस्टरद्वारे सुरक्षा यंत्रणा करण्यात येणार आहे. खासगी सुरक्षासह अत्याधुनिक यंत्रणा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी अत्याधुनिक संपर्क यंत्रणा, सतर्कतेसाठी अलर्ट सिस्टीम आणि सीसीटीव्हीसारखी निरीक्षण यंत्रणाही उपलब्ध केली जाणार आहे. यासाठी सुरक्षेकरता तटरक्षकदल, गिर्यारोहक संघटना आणि स्थानिक स्तरावरील तातडीची आपत्ती निवारण पथक सहकार्य करणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांनी दिली आहे.
हे धबधबे सुरक्षित होणार
रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यातील धूतपापेश्वर, सवतकडा तर चिपळूण तालुक्यात सवतसडा, रत्नागिरी तालुक्यातील निवळी, निवेंडी, मंडणगडमध्ये चिंचवडी, रघुवीर घाट आणि लांजा तालुक्यातील खोरनिनको, संगमेश्वरातील मार्लेश्वर आदी धबधब्यांच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. यासाठी सुरक्षेकरता तटरक्षकदल, गिर्यारोहक संघटना आणि स्थानिक स्तरावरील तातडीची आपत्ती निवारण पथक सहकार्य करणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांनी दिली आहे.