अडीच एफएसआयतून नवी मुंबईतील पहिल्या सोसायटीची पुनर्बांधणी

अडीच एफएसआयतून नवी मुंबईतील पहिल्या सोसायटीची पुनर्बांधणी

गेले सहा ते सात वर्ष धोकादायक इमारतीमध्ये राहणार्‍या नेरूळ सेक्टर 6 येथील दत्तगुरू सहकारी सोसायटीतील रहिवाशांचे स्वप्न पूर्णत्वाकडे जात असून अडीच एफएसआयच्या माध्यमातून नवी मुंबईतील या पहिल्या सोसायटीच्या पुनर्बांधणीचा शुभारंभ आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडला.

या सोसायटीची पुनर्बांधणी होण्यासाठी सोसायटीचे प्रमुख मार्गदर्शक तथा माजी नगरसेवक सूरज पाटील यांनी आतोनात प्रयत्न केले आहेत. नवी मुंबई पालिकेत अविरत पाठपुरावा त्यासाठी केला आहे. कधी सनदशीर मार्गाने तर कधी गरज भासलीच तर आक्रमकपणे सोसायटीमधील रहिवाशांना पुनर्बांधणीतून पक्की आणि सुरक्षित घरे मिळण्यासाठी ठाम भूमिका घेतली आहे.

कोरोनाची खबरदारी घेऊन पार पडलेल्या या कार्यक्रमास माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सागर नाईक, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी नगरसेवक सुरज पाटील, माजी सभागृह नेते रविंद्र इथापे, माजी नगरसेवक विनोद म्हात्रे, गिरीश म्हात्रे, विशाल डोळस, सुजाता पाटील, जयश्री ठाकूर, स्नेहा पालकर, माजी परिवहन सभापती प्रदीप गवस, प्रभाग समिती सदस्य सुदत्त दिवे, समाजसेवक गणेश भगत, सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र बागल, सचिव राजकुमार पाटील, खजिनदार तानाजी पाटील, उपाध्यक्ष राजकुमार पुरी, सहसचिव विष्णू बोरकर,संचालक प्रकाश जाधव, हनुमंत भोसले, विक्रम अहेर, यशवंत तोरस्कर, संभाजी गायकवाड, मोहन इंदलकर, दीपाली मते, सुमन सावंत, तुकाराम माने आदी मान्यवर उपस्थित होते.

माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईतील सिडकोनिर्मित धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी अडीच एफएसआय मंजूर केला होता. असे नमूद करून आमदार नाईक यांनी सोसायटी पुनर्बांधणीचा प्रश्न निकाली लागल्याने दत्तगुरू सोसायटीमधील रहिवाशांच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहून आपल्यालाही आनंद होतो, अशा भावना व्यक्त केल्या. माजी नगरसेवक सूरज पाटील यांनी सोसायटी पुनर्बांधणीचा प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी परिश्रम घेतले आहेत.

अधिकचा एफएसआय मिळाला तर आनंदच धोकादायक इमारती पुनर्विकासाकरिता चार एफएसआयची मागणी होऊ लागल्याबददल पत्रकारांनी विचारले असता रहिवाशांना जास्तीत जास्त एफएसआय मिळाला तर आनंदच आहे. नगरविकास खात्याच्या नियमानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा एफएसआय दिला जातो. पंतप्रधान आवास योजना व्हायलाच पाहिजे, सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करणारी पंतप्रधान आवास योजना व्हायलाच हवी. परंतु सार्वजनिक सुविधांच्या जागांवर ती राबवून दाटीवाटी करण्यापेक्षा जेथे विस्तीर्ण जागा उपलब्ध आहे त्या नैना सारख्या क्षेत्रात ती नियोजनपूर्वक राबवावी, या मताचा गणेश नाईक यांनी पुनरूच्चार केला आहे.

दत्तगुरू सोसायटीची पुनर्बांधणी होणार असल्याचे रहिवाशांच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहून मी देखील समाधानी आहे. पुनर्बांधणीकरिता आमदार गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली गेले सात वर्षे पाठपुरावा सुरू होता. अडीच एफएसआयच्या माध्यमातून नवी मुंबईतील धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीचा शुभारंभ दत्तगुरूपासून होत आहे. – सूरज पाटील, माजी नगरसेवक

गेले सात वर्षे सोसायटीच्या पुनर्बांधणीसाठी आमचा लढा सुरू होता. नवी मुंबईचे शिल्पकार गणेश नाईक यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ झाला आहे. दत्तगुरूमधील सर्व सदस्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. – राजेंद्र बागल, अध्यक्ष दत्तगुरू सोसायटी

First Published on: December 26, 2020 7:02 AM
Exit mobile version