नाशिकरोड । दारणाकाठी बिबट्यांच्या हल्लात बळी गेलेल्या तीन जणांना नर बिबट्याने ठार केल्याचा अहवाल प्राप्त झाल्याची माहिती वनविभागाच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान तीनही हल्ल्यातील बिबटे एकच आहेत की वेगवेगळे, याबाबत मात्र तंत्रज्ञान अद्यापपर्यंत उपलब्ध नसल्याने स्पष्ट होत नसल्याचेही वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांनी सांगितले.
नाशिक तालुक्यातील दोनवाडे गावातील रुद्र शिरोळे, जीवराम ठुबे व बाभळेश्वर येथील पाच वर्षीय बालिका यांचा बळी घेतले होते. त्याचप्रमाणे हिंगणवेढे गावातील एका मुलाचा बळीही घेतला होता. एक महिन्याच्या अंतरात बिबट्याच्या हल्ल्यात तीन बळी गेल्याने नागरिकांचा प्रंचड रोष होता. तर स्थानिक आमदार सरोज आहिरे यांनी वन मंत्री संजय राठोड यांना पत्र देऊन बिबटे जेरबंद किंवा ठार करण्याची मागणी केल्याने खळबळ उडाली होती.
दरम्यान, वन परिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे दोनवाडे व बाभळेश्वर येथील बिबट्याच्या हल्लात बळी पडलेल्यांच्या जखमांवरुन बिबट्याच्या लाळेचे नमुने घेऊन ते हैद्राबाद येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्या तीनही व्यक्तींचे बळी घेतलेला बिबट नर असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. परंतू तपासणीत केवळ नर किंवा मादी याचीच माहिती उपलब्ध होऊ शकते, मात्र हल्ले करणारे नर एक अनेक याबाबत कोणतेही तंत्रज्ञान उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले.