राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मुंबईत ‘इफ्तार पार्टी’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मुंबईत ‘इफ्तार पार्टी’

इफ्तार पार्टी

मुस्लिम समुदायाशी जवळीक साधण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुंबईत इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान निवासस्थानी अशा कार्यक्रमाचे नियोजन न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर लगेच संघाने ‘इफ्तार पार्टी’चे नियोजन करण्याचे ठरविले. आतापर्यंत संघ फक्त उत्तर प्रदेशातच ‘इफ्तार पार्टी’ आयोजित करत होता. मात्र यावर्षी पहिल्यांदाच मुंबईत ‘इफ्तार पार्टी’चे नियोजन करण्यात आले आहे.

इस्लामिक देशातील पुढाऱ्यांनाही निमंत्रण

मुंबईत आयोजित होणाऱ्या इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमाला इस्लामिक देशाच्या राजकारण्यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ४ जून रोजी मुंबईच्या सह्याद्री गेस्ट हाऊस येथे संपन्न होणार आहे. संघाशी संलग्न असलेल्या मुस्लीम राष्ट्रीय मंच (एमआरएम) या कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. एमआरएमचे राष्ट्रीय संयोजक विराग पचपोरे यांनी सांगितले की, “साधारणत: जगभरातील ३० देशांचे कार्यकर्ते, मुस्लिम समितीचे २०० प्रमुख चेहरे आणि या समुदायाच्या १०० सदस्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला आहे.”

इफ्तार पार्टीत मुस्लिम सिनेतारकांनाही आमंत्रण

विराग पचपोरे यांनी सांगितले की, “मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईतली अनेक मुस्लिम व्यापाऱ्यांनी देशाच्या विकासासाठी योगदान दिले आहे. मुस्लिम कलाकारही येथे अनेक आहेत, ज्यांनी सिनेसृष्टीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. याच कलाकारांसोबत संबंध दृढ व्हावे, या उद्देशाने मुंबईतील इफ्तार पार्टीमध्ये कलाकारांना आमंत्रण दिले आहे.

‘इफ्तार पार्टी’ म्हणजे काय?

रमजान हा मुस्लीम धर्मातील लोकांचा पवित्र महिना. या महिन्यात दिवसभर उपवास केला जातो. या उपवासाला रोजा असे संबोधले जाते. दिवसाच्या मावळतीला म्हणजे संध्याकाळी रोजा सोडला जातो. दिवसभराचा रोजा सोडणे यालाच ‘इफ्तार’ असे म्हणतात. हा रोजा आपले नातेवाईक, मित्रमंडळींंसोबत एकत्र सोडला जातो. म्हणून त्याला ‘इफ्तार पार्टी’ असे म्हणतात.

First Published on: May 30, 2018 7:50 AM
Exit mobile version