‘आंबा खाऊन होते अपत्यप्राप्ती’ – संभाजी भिडे

‘आंबा खाऊन होते अपत्यप्राप्ती’ – संभाजी भिडे

संभाजी भिडे

संभाजी भिडे हे नाव सध्या चर्चेतून बाहेर निघण्याचं नाव घेत नाही. माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते असं अजबगजब वक्तव्य श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे. आपल्या शेतातील आंबा खाऊन आजपर्यंत १५० जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाल्याचा दावा त्यांनी नाशिकमधील सभेत केला.

‘आंबा खाऊन होईल मुलगा’

‘लग्न होऊन १५ वर्ष जोडप्यांना मूल होत नाही. अशा स्त्री – पुरुषांनी हा आंबा खाल्ल्यास त्यांना नक्की मुलं होतील. आतापर्यंत मी १८० पेक्षा अधिक लोकांना हा आंबा खायला दिला असून त्यापैकी १५० जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाली आहे.’ अशी मुक्ताफळं या सभेत संभाजी भिडे यांनी उधळली आहेत. इतकंच नाही तर, ‘ज्यांना मुलगा हवा असेल, त्यांना मुलगाच होईल.’ असा दावाही संभाजी भिडे यांनी यावेळी केला.

आतापर्यंत फक्त आईलाच सांगितली होती ही माहिती

आतापर्यंत ही गोष्ट फक्त आपल्या आईलाच माहिती होती. मात्र आता तुम्हालादेखील हे सांगत असल्याचं त्यांनी यावेळी उपस्थित लोकांना सांगितलं. संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर सध्या जोरदार चर्चा रंगली असून अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. या वक्तव्यानंतर आता भिडेंवर कोणती कारवाई केली जाणार का? हे लवकरच कळेल.

First Published on: June 11, 2018 8:09 AM
Exit mobile version