ममता बॅनर्जी आणि शरद पवारांची भेट देशाच्या राजकारणाच्यादृष्टीने महत्त्वाची – संजय राऊत

ममता बॅनर्जी आणि शरद पवारांची भेट देशाच्या राजकारणाच्यादृष्टीने महत्त्वाची – संजय राऊत

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी या मुंबई दौऱ्यावर आहेत. मंगळवारी त्यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांची भेट घेतली. दरम्यान, आज बुधवारी त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. या भेटीवर प्रतिक्रिया देताना ममता बॅनर्जी आणि शरद पवारांची भेट देशाच्या राजकारणाच्यादृष्टीने महत्त्वाची आहे, असं संजय राऊत म्हणाले.

ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री असल्या तरी मोठ्या नेत्या आहेत. बंगालमध्ये वाघीणीसारखी झुंज दिली आणि सगळ्या लांडग्यांना पळवून लावलं. हे पाहता देश ज्या प्रमुख लोकांकडे पाहतोय त्यात उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, शरद पवार आहेत. शरद पवार सतत सर्वांना एकत्र घेऊन निर्णय घेत असतात. ममता बॅनर्जी आणि शरद पवारांची भेट देशाच्या राजकारणाच्यादृष्टीने महत्त्वाची आहे. पवारांच्या उंचीचा राजकीय दृष्टीने आज एकही नेता आपल्या देशात नाही. पश्चिम बंगालमध्ये डावे, काँग्रेस भुई सपाट झाले. जो भाजप तुतारा फुंकत, वाजत गाजत त्यांचं जे बेंडबाजा पथक तिथे आलं होतं
त्यांच्या बेंडबाज्यातील हवाही ममता यांनी काढून घेतली. मोठा विजयी मिळवला. काँग्रेस आणि त्यांचा वाद आहे. त्या मुळच्या काँग्रेसचा आहे. समर्थ अशी आघाडी आपल्याला उभी करायची असेल तर आपल्याला सर्वांना घेऊनच जावं लागेल, असं संजय राऊत म्हणाले.

ममता बॅनर्जींशी राजकीय चर्चा केली

“बंगालची वाघीण ममता बॅनर्जी या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. हा दौरा मुंबईत शासकीय कामासाठी असला तरी त्या जेव्हा मुंबईत येतात तेव्हा त्या ठाकरे कुटुंबातील प्रमुख व्यक्तींची भेट घेतात. मागच्यावेळेस उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे भेटले होते. आम्ही दिल्लीत, बंगालमध्ये जाऊन भेटत असतो. ममता बॅनर्जी यांचं स्वागत काल आदित्य ठाकरे यांनी स्वत: जाऊन केलं. त्यांना उद्धव ठाकरे यांना भेटण्याची इच्छा होती पण उद्धव ठाकरे हे बायोबबलमध्ये आहेत. त्यामुळे आम्ही ती भेट टाळली, त्यांनी स्वत: देखील भेट टाळली. आदित्य ठाकरेंनी त्यांचे आशीर्वाद घेतले. आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या भेटवस्तू ममता बॅनर्जी यांना दिल्या. ममता बॅनर्जी यांनी देखील आदित्य ठाकरे यांना रविंद्र नाथ टागोर आणि शिवाजी महाराज यांची प्रतिमा दिली. यावेळी राजकीय चर्चा केली,” अशी माहिती राऊत यांनी दिली.

“ममता बॅनर्जी या सिद्धीविनायकच्या भक्त आहेत. उद्धव ठाकरे यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी आणि लवकरच ते राष्ट्रीय राजकारणात सक्रीय व्हावेत यासाठी सिद्धीविनायकाकडे प्रार्थना केली असं आवर्जून आम्हाला सांगितल्याचं” राऊत यांनी सांगितलं.

ज्या पद्धतीने महाराष्ट्रात भाजपचे प्रमुख कार्यकर्ते ईडी, सीबीआय, आयकरची दहशत निर्माण करत आहेत. सरकार अस्थिर करण्याच प्रयत्न करत आहेत. अशाच प्रकारचं महान कार्यकर्ते पश्चिम बंगालमध्ये करत आहेत. आम्ही त्यांना पुरुन उरलो आहोत, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रासुद्धा सरकारी दहशतावद्यांशी सामना करेल असं त्यांनी सांगितलं. जय मराठा, जय बांगला अशी घोषणा ममता बॅनर्जी यांनी दिली आहे. दोन्ही राज्य एकत्रितपणे लढतील अन्यायाशी, असत्याशी आणि विजयी होतील असा विश्वा त्यांनी व्यक्त केला, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

 

First Published on: December 1, 2021 10:57 AM
Exit mobile version