शिंदे-फडणवीस सरकारमध्ये हिम्मत नाही, सरकार नपुंसक; सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये हिम्मत नाही, सरकार नपुंसक; सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

 

नवी दिल्लीः भडकाऊ भाषणे रोखण्याची शिंदे-फडणवीस सरकारमध्ये हिम्मत नाही. हे सरकार नपुंसक आहे, असे खडेबोल सर्वोच्च न्यायालयाने सुनावले आहेत. हिंसक प्रकार होत असताना सरकार शांत का आहे?. सरकराने असे प्रकार रोखण्यासाठी योग्य ती पावले का नाही उचलली, असा सवाल करत याचे प्रत्त्यूतर सादर करण्याचे आदेश न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत.

सकल हिंदू समाजाचा मुंबईत मोर्चा निघाला होता. या मोर्च्यामध्ये प्रक्षोभक भाषणे करण्यात आली. घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर ठिकठिकाणी हे मोर्चे निघाले. मात्र अशा मोर्च्यांना परवानगी देऊ नये, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. अशा मोर्च्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करा व त्यावर योग्य ती कारवाई करा, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले होते. यावरील पुढील सुनावणी न्या. के. एम. जोसेफ व न्या. नागरथन यांच्या खंडपीठासमोर झाली. त्यात न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारला चांगलेच फटकारले. तसेच देशामध्ये सर्वच स्थरातून भडकाऊ भाषण केले जात आहे, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.

पंडित नेहरु आणि वाजपेयींची आठवण

आपल्याकडे पंडित जवाहरलाल नेहरू आणि अटलबिहारी वाजपेय यांच्यासारखे नेते होते.  त्यांची भाषणे मध्यरात्री असली तरी ती ऐकण्यासाठी खेड्या पाड्यातून लोक यायची. आता मात्र भडकाऊ भाषणे केली जातात. कमी शिक्षण व अपुऱ्या माहितीमुळे अल्पसंख्याक विरोधात प्रक्षोभक भाषणे केली जातात.

पाकिस्तानला निघून जा म्हणणे चूक

पाकिस्तानला निघून जा म्हणणे चूकच आहे. सतत अशी वक्तव्ये करुन आत्मसन्मानाला धक्का पोहोचवण्यासारखे आहे. ते आपल्या बहिण-भावा सारखे आहेत. आपण शाळेत काय शिकलो ते आठवा. आपण खालच्या पातळीवर जाऊन भाषणे करणे योग्य नाही, असे मतही न्या. जोसेफ यांनी व्यक्त केले.

सकल हिंदू समाजाला खडसावले

मोर्चे काढणे हा आमचा अधिकार आहे, असा युक्तिवाद सकल हिंदू समाजाच्यावतीने करण्यात आला. तुम्ही मोर्चे काढता ही वेगळी गोष्ट आहे आणि मोर्च्यांमध्ये काय करता हा भाग वेगळा आहे. राज्य घटनेने अल्पसंख्याकांना काही अधिकार दिले आहेत. कोणाला सहन करणे ही सहिष्णुता नाही. वेगळेपणा स्विकारणे याला सहिष्णुता म्हणतात, असे न्यायालयाने सकल हिंदू समाजाला खडसावले.

 

जिंतेंद्र आव्हाडांनी केले समर्थन

भडकाऊ भाषणे रोखण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले या सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेद्र आव्हाड यांनी समर्थन केले आहे. अशी भाषणे केल्यानंतर पोलिसांकडून न्यायालयाने अपेक्षा व्यक्त केली आहे. मध्यंतरी ठाण्यातही अशी भाषणे झाली होती. त्याची क्लिप पोलिसांना पाठवली होती. त्यावर अजून कारवाई झालेली नाही, असे ट्वीट आमदार आव्हाड यांनी केले आहे.

 

First Published on: March 30, 2023 9:07 AM
Exit mobile version