उद्धव ठाकरे यांचे कालचे गटप्रमुख मेळाव्यातील भाषण म्हणजे निराशेचे अरण्यरुदन होते. उद्धव ठाकरे भाषणात म्हणाले की, ही माझी शेवटची निवडणूक आहे. महाविकास आघाडीने २०१९ पासून गेल्या अडीच वर्षांत मला संपवण्याचा अनेकदा प्रयत्न केला, पण मला कोणीही संपवू शकत नाही. यापुढेही संपवू शकणार नाही, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यांशी संवाद साधताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला.
गोरेगावच्या नेस्को संकुलात बुधवारी शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा झाला. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर घणाघाती टीका करताना हिंमत असेल तर महिनाभरात मुंबई महापालिका आणि विधानसभा निवडणुका घ्या, असे आव्हान दिले. या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी जोरदार प्रत्युत्तर दिले. आम्ही कायदेशीरपणे निवडून आलो आहोत, पण तुम्ही २०१९ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो दाखवून निवडून आले.
निवडणूक लढवली आमच्यासोबत, पण निवडून आल्यानंतर राष्ट्रवादी, काँग्रेससोबत आघाडी करून आमच्या पाठीत खंजीर खुपसला. तेव्हा तुमच्यात हिंमत होती, तर त्यावेळी तुम्ही राजीनामे देऊन परत निवडणूक का घेतली नाही, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच २०१९ला मविआने मला संपवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते तेव्हाही मला संपवू शकले नाहीत आणि यापुढेही संपवू शकणार नाहीत, असेही फडणवीस म्हणाले.