शहीद जवानाला कन्यारत्न, पाक हल्ल्यात आले होते वीरमरण

शहीद जवानाला कन्यारत्न, पाक हल्ल्यात आले होते वीरमरण

शहीद जवान केशव गोसावी

जम्मू- काश्मीरच्या राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा सेक्टरमध्ये गस्त घालणाऱ्या भारतीय सैनिकांवर हल्ला झाला. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन हा हल्ला चढवला होता. यात नाशिकच्या सोमवीर गोसावी या जवानाला वीरमरण आले होते. ज्यावेळी गोसावी यांना वीरमरण आले. त्यावेळी त्यांच्या पत्नी या ९ महिन्यांच्या गर्भवती होत्या. आज त्यांच्या पत्नीला कन्यारत्न झाले आहे. अगदी आठवड्यापूर्वीच या तान्हुलीच्या डोक्यावरुन वडिलांचे छत्र हरपले. आपले अपत्य सैन्यात जावे असे त्यांचे स्वप्न होते. पण काळाने घात केला आणि मुलीच्या जन्माआधीच त्यांना वीरमरण आले. त्यांच्या जाण्याने त्यांचे गाव दु:खात बुडाले.  पण या तान्हुलीच्या आगमनाने त्यांच्या घरी आनंद परतला आहे.

गस्त घालताना आले वीरमरण

जम्मू- काश्मीरमध्ये मराठा लाइट इन्फन्ट्रीची तुकडी गस्त घालत होती. यावेळी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पाकिस्तानने ‘स्नायपर’ हल्ला केला. यात केशव यांना गोळी लागली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांना वीरमरण आले. या हल्ल्याला भारतीय लष्कराने देखील चोख उत्तर देत पाकिस्तानी चौक्यांचे नुकसान केले. नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील शिंदेवाडीचे रहिवासी असलेल्या केशव यांच्या निधनाची बातमी कळाल्यानंतर त्यांच्या संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती. घरातील कर्ता पुरुष गमावल्याचे दु:ख कुटुंबाला झाले होते. पण आता ८ दिवसानंतर त्यांच्या घरी आनंद कन्येच्या रुपातून परतला आहे.

२५ लाखांची मदत जाहीर

गोसावी यांच्या कुटुंबियांना २५ लाखांची मदत सरकारकडून जाहीर केली आहे. महत्वाची बाब अशी की, ८ दिवस दु:खात बुडालेल्या गावाला या तान्ह्या मुलीमुळे आनंद झाला आहे.

First Published on: November 19, 2018 4:58 PM
Exit mobile version