राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज बीड जिल्ह्यात आष्टी येथे लोकसभेच्या प्रचारासाठी आले होते. आष्टीची सभा संपल्यानंतर येथील शेतकऱ्यांनी पवारांना बीड येथे दुष्काळाच्या तीव्र झळा पोहोचत असल्याचे सांगितले. तसेच बीडमधील चारा छावण्या आहेत, मात्र तिथे अनंत अडचणीचा सामना करावा लागत असल्याने पवारांनी चारा छावण्यांना भेट द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली. आष्टीची सभा संपवून शरद पवार गेवराई येथे पुढील सभेसाठी हेलिकॉप्टरने जाणार होते. मात्र शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी त्यांनी हेलिकॉप्टरने न जाता रस्त्यानेच जाण्याचा निर्णय घेतला.
बीडमध्ये ऑक्टोबरमध्ये दुष्काळ जाहीर झालेला असताना शासनाने सहा महिन्यांनंतर मार्च महिन्यात चारा छावण्या सुरू केल्या आहेत. दुष्काळात जनतेचे खूपच हाल आहेत. बीडमध्ये २८० चारा छावण्या आहेत. पण त्यात अनंत अडचणी आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा सांगितल्यानंतर शरद पवार यांनी पायलटला निरोप पाठवला आणि हेलिकॉप्टर बीडला पाठवून दिले. आपण बाय रोड गेवराईला जायचे. वाटेतल्या चारा छावण्यांना भेट देत जायचे, असा निर्णय त्यांनी घेतला.
मराठवाड्यात सध्या ४०-४५ डिग्री तापमान सुरु आहे. या रणरणत्या उन्हात देखील शरद पवार यांनी भर दुपारी रस्त्यावरून प्रवास करत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. याची चर्चा बीडमध्ये सुरु आहे.