मुंबई १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या घटनेचा उल्लेख पुन्हा एकदा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. त्यावेळी मुख्यमंत्री असताना मला श्रीकृष्ण आयोगाकडून समन्स पाठवण्यात आला होता. तसेच चौकशीला बोलावण्यात आले होते. मुख्यमंत्री असताना १२ व्या बॉम्बस्फोटाबाबत खोटी माहिती का दिली ? असाही सवाल आयोगाकडून करण्यात आला होता. त्यावर बोलताना सामाजिक एेक्य आणि सलोखा टिकवण्यासाठीच मी बॉम्बस्फोटाबाबतची खोटी माहिती दिल्याचा खुलासा त्यांनी आयोगाकडे केला होता. आज जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी या गोष्टीचा उल्लेख करत स्पष्टीकरण दिले.
मुंबईत १९९३ साली जेव्हा बॉम्बस्फोट झाले तेव्हा मी मुख्यमंत्री होतो. केंद्रातून संरक्षण खात्याची जबाबदारीतून मुक्त होऊन अवघे १५ दिवस झाले होते. त्यावेळी बॉम्बस्फोटाची माहिती देताना मुंबईत बॉम्बस्फोट झाले ही माहिती मी दिली. कारण ज्याठिकाणी बॉम्बस्फोट झाले ती सगळी ठिकाणे ही हिंदुंची होती. त्यामध्ये महत्वाच्या अशा ठिकाणांमध्ये सिद्धीविनायक मंदिरासारख्या ठिकाणांचा समावेश होता.
हा बॉम्बस्फोट कोणी केला याचा शोध घेण्यासाठी तसेच बॉम्बस्फोटाचा हेतू काय याचा शोध घेण्यासाठी मी बॉम्बस्फोटात वापरलेले मटेरिअल प्रत्यक्ष जाऊन मी पाहिले. देशात कुठेच तशा प्रकारच्या स्फोटकांचे मटेरिअल तयार होत नाही, ही संरक्षण मंत्री म्हणून मला माहिती होती. हे बॉम्बस्फोटांसाठी वापरण्यात आलेले मटेरिअल हे कराची येथून आणल्याचे मला कळाले. त्यामुळे देशात हिंदु मुस्लिम सलोखा बिघडवण्यासाठी अशा पद्धतीने मटेरिअल वापरल्याचे मला त्यावेळी कळाले. म्हणून हिंदु मुस्लिम वाद वाढवण्यासाठी अशा प्रकारची कारवाई झाल्याचा मला अंदाज आला. त्यामुळेच ११ ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटाच्या व्यक्तीरिक्त मी मुस्लिबहुल भाग असलेल्या मोहम्मद अली रोड येथे बॉम्बस्फोट झाल्याची माहिती त्यावेळी दिली. त्यामुळे परकीय शक्तीविरोधात देशातील हिंदु मुस्लिम समाज एकत्रितपणे उतरला. कारण यामध्ये स्थानिक मुस्लिमांचा कोणताही सहभाग नव्हता.
श्रीकृष्ण आयोगानेही केले कौतुक
त्यावेळी श्रीकृष्ण आयोगानेही पवार मुख्यमंत्री असताना या प्रकारची भूमिका घेतली नसती तर मुंबईत आग लागली असती, असे मत मांडले. तसेच तर समाजात आग लागली असती असाही उल्लेख त्यावेळी केला. त्यामुळे सद्यपरिस्थितीत ज्या लोकांना गोष्टींचे तारतम्य किंवा गांभीर्य कळत नाही अशा लोकांकडूनच अशी धार्मिक सलोखा बिघडवणारी वक्तव्ये समोर येतात, असेही मत शरद पवार यांनी यावेळी मांडले.