चौकशी करा, पण आरोप खोटे ठरले तर काय करणार हेही स्पष्ट करा : शरद पवार

चौकशी करा, पण आरोप खोटे ठरले तर काय करणार हेही स्पष्ट करा : शरद पवार

मुंबई – पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली. पत्राचाळ प्रकरणात शरद पवार यांचे नाव अतुल भातखळकर यांनी घेतले होते . यावर प्रतिक्रिया देताना चौकशी करायची असेल तर लवकर करा, पण आरोप खोटे ठरल्यास त्यांच्यावर काय कारवाई करणार, असा सवाल राज्य सरकारला शरद पवारांनी केला .

शरद पवार काय म्हणाले –

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी  शरद पवार यांनी राज्य सरकारला आव्हान दिले आहे. चौकशीला कधीच नाही म्हटलेले नाही. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी चौकशी करायची असेल तर लवकरात लवकर करा. पण, जर आरोप खोटे ठरले तर काय करणार हे ही सरकारने स्पष्ट करावे असेही पवार म्हणाले. यावेळी भाजप सरकरच्या काळात देशातील नागरिकांसमोरील प्रश्न बाजूला ठेवून अन्य पक्षाच्या नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावण्याचा कार्यक्रम सुरू असल्याची टीका शरद पवारांनी केली.

बैठकीत कोणताही निर्णय नाही – जितेंद्र आव्हाड

या पत्रकार परिषदेला जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. या वेळी शरद पवारांनी 14 जानेवारी 2006 रोजी बैठक घेतली. या बैठकीत सर्व अधिकारी आणि संबंधित लोकं उपस्थित होते असे जितेंद्र आव्हाडांनी सांगितले. पत्राचाळ प्रकरणात शरद पवारांनी बैठक घेतली यात नवल काय असा सवाल करत राज्यातील विविध प्रश्नी अनेक बैठका शरद पवार यांनी घेतल्या होत्या. चर्चा करुन संवाद साधणे आणि मध्य मार्ग काढणे हाच हेतू त्या बैठकीत होता, असे आव्हाड म्हणाले. राज्याचे माजी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय तत्कालीन गृहनिर्माण विभागाचे सचिव होते. त्यांनी या बैठकीचे इतिवृत्त असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. या बैठकीत कोणताही निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत सरकार निर्णय घेईल असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले होते. संवाद साधून मार्ग काढण्याचा प्रयत्न राजकीय नेत्यांचा असतो. तेच या प्रकरणात झाल्याचे आव्हाड यांनी म्हटले. या प्रकरणात चौकशी करावी. त्याला आमचा विरोध नाही. मात्र, भाजपकडून पराचा कावळा करण्यात येत असल्याचे आव्हाडांनी सांगितले.

पत्राचाळ प्रकरणात अतुल भातखळकरांची चौकशीची मागणी –

पत्राचाळ घोटाळा नवीन खुलासे होत असतानाच ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहभागाची कालबद्ध मर्यादेत चौकशी करावी अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी केली होती. अतुल भातखळकर यांनी ही मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली होती. पत्राचाळीच्या भ्रष्टाचाराचा आवाका पाहाता हे प्रकरण फक्त संजय राऊत यांना झेपणारे आहे असे सुरुवातीपासून वाटत नव्हते, असेही भातखळकर यांनी म्हटले होते. याबाबत पत्र लिहून पत्राचाळ घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी भातखळकर यांनी केली होती.

First Published on: September 21, 2022 1:31 PM
Exit mobile version