राज्यात आतापर्यंत परदेशातील १९७२ नागरिक परतले

राज्यात आतापर्यंत परदेशातील १९७२ नागरिक परतले

वंदे भारत अभियानांतर्गत महाराष्ट्रात आतापर्यंत १९७२ नागरिक आले असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली असून, त्यांच्या क्वारंटाईनची काटेकोर अंमलबजावणी केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान सर्व सरकारी यंत्रणा कोरोना निर्मुलनासाठी निग्रहाने लढत असताना माणुसकीच्या नात्याने परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील आणि इतर राज्यांमधील नागरिकांना मुंबईत उतरवून घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्याची व्यवस्था राज्य सरकार तर्फे करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. वंदे भारत अभियानांतर्गत १० देशातून १३ फ्लाईट्सद्वारे हे नागरिक महाराष्ट्रात आले असून, यात मुंबईतील ८२२ प्रवासी आहेत, उर्वरित महाराष्ट्रातील १०२५ तर इतर राज्यातील १२५ प्रवासी असल्याची माहितीही त्यांनी दिली. अजून २७ फ्लाईटसने परदेशात अडकलेले नागरिक महाराष्ट्रात येणे अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्री म्हणालेत.

या ठिकाणाहून आले नागरिक

आतापर्यंत महाराष्ट्रात लंडनहून ६५३, सिंगापूरहून २४३, मनिला १५०, सॅन फ्रान्सिस्को १०७, ढाक्या १०७, न्युयॉर्क २०८, क्वाललंपुर २०१, शिकागो १९५, कुवेत २, आदिस अबबावरून ७८, काबूल १२ आणि मस्कत- ओमान १६ नागरिक आले आहेत.

आलेल्या नागरिकांचे संस्थात्मक क्वारंटाईन

मुंबईतील प्रवाशांची संस्थांत्मक क्वारंटाईनची सुविधा हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवासी यांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. विशेष म्हणजे राज्य त्यांच्या नागरिकाना घेण्यास तयार नाहीत त्यांना मुंबई येथे संस्थात्मक क्वारंटाईनची सुविधा उपलब्ध करून दिली जात असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

First Published on: May 19, 2020 9:08 PM
Exit mobile version