केंद्र सरकारने कांद्यावर अन्यायकारक निर्यातबंदी करून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जाण्यास भाग पाडले असल्यामुळे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेकडून कांदा निर्यातबंदीच्या विरोधात जगातील सर्वात मोठे सोशल मीडिया आंदोलनाला सुरुवात करण्यात येणार आहे. २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात आधार घेऊन देशभरामध्ये शेतकरी व शेती विकासाचे स्वप्न दाखवून केंद्रातील मोदी सरकार सत्तेत आले होते परंतु सरकारची प्रत्यक्ष कृती मात्र शेतकरी विरोधी असल्याचे वारंवार त्यांच्याच कृतीतून दिसून आले आहे. सरकारने नुकतीच कांद्यावरील निर्यातबंदी करून सरकारची शेतकरीविरोधी भूमिका अधोरेखित केली आहे या निर्यातबंदीच्या विरोधात महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली लाखो कांदा उत्पादक शेतकरी शनिवारी फेसबुक लाईव्ह, रविवारी व्हॉट्सअॅप मेसेज, सोमवारी ट्विटर मोहीम, मंगळवारी इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरून केंद्राच्या या निर्यातबंदीच्या विरोधात आंदोलन छेडतील.
मागील वर्षी अतिवृष्टीने महाराष्ट्रातील कांद्याचे प्रचंड नुकसान झाल्यानंतर कांदा दरात वाढ झाल्यानंतर केंद्राने २९ सप्टेंबर २०१९ ला निर्यातबंदी केली. ही बंदी हटवत असताना केंद्राने प्रत्यक्ष घोषणा २६ मार्च २०२० ला केली, त्याची अधिसूचना २ मार्चला काढली आणि प्रत्यक्ष कांदा निर्यातीसाठी १५ मार्चची मुदत दिली आणि २२ मार्चचा जनता कर्फ्यू २५ मार्चपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकर्यांचा कांदा सलग पाच ते सहा महिने ५०० ते आठशे रुपये प्रतिक्विंटल दराने म्हणजे उत्पादन खर्चाच्या निम्या भावाने विकला गेला. तेव्हा सरकारने दर वाढण्यासाठी हालचाल केली नाही. परंतु, आता १४ सप्टेंबरला कांद्यावर निर्यातबंदी करताना २ तासात ही निर्यात बंदी केली आहे. मोदी सरकार कृतीतून मात्र पूर्णपणे शेतकरीविरोधी भूमिका घेत आहे. त्यावर १४ सप्टेंबरला निर्यातबंदीमुळे शिक्कामोर्तब झाले.
असे असेल आंदोलन
आता शनिवारी १९ सप्टेंबरपासून राज्यातील लाखो कांदा उत्पादक शेतकरी मोबाईलमधून फेसबुक लाईव्ह करून रविवारी २० सप्टेंबरला आपापल्या मतदारसंघातील आमदार, खासदार मंत्रीविरोधी पक्षनेते यांना व्हॉट्सअॅप मेसेज करतील, सोमवारी (दि.२१) पंतप्रधान, केंद्रीय कृषिमंत्री, केंद्रीय वाणिज्य मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांना टॅग करून ट्विट करतील यावेळेस #justiceforonionfarmers हा हॅशटॅग वापरुन राज्यभरातील लाखो कांदा उत्पादक ट्विट करतील. मंगळवारी २२ सप्टेंबर रोजी इंस्टाग्राम, युट्युबवरून कांदा उत्पादक शेतकरी निर्यातबंदी उठवण्याची मागणी करतील.