काही लोक आम्हाला मतदान करणार, तिसरा उमेदवार निवडून येणार, फडणवीसांना विश्वास

काही लोक आम्हाला मतदान करणार, तिसरा उमेदवार निवडून येणार, फडणवीसांना विश्वास

मुंबईः आमचे तिन्ही उमेदवार हे भारतीय जनता पक्षातले आहेत. आमचे तीनही उमेदवार महाराष्ट्रातले आहेत. आमचे तीनही उमेदवार राजकीय क्षेत्रात पूर्णपणे सक्रिय आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे, सदसदविवेक बुद्धीने काही लोक आम्हाला मतदान करणार आहेत आणि निश्चित आमचे उमेदवार निवडून येतील, असं म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होणार असल्याचे संकेत दिलेत. पीयूष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिकांनी आज भाजपकडून राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरलेत, त्यावेळी देवेंद्र फडणवीस माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

आज राज्यसभेच्या निवडणुकीकरिता भारतीय जनता पार्टीतर्फे तीन उमेदवारांची उमेदवारी आम्ही दाखल केली. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल हे पुन्हा एकदा महाराष्ट्रातून राज्यसभेवर जात आहेत. पीयूषजींच्या बद्दल आपल्याला सगळी माहिती आहे. मुंबईचेच आहेत आणि देशामध्ये राज्यसभेत नेते म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आहे. ते पुन्हा एकदा महाराष्ट्रातून जातायत. निवडून जातायत याचा आम्हाला अभिमान आहे, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय.

त्यासोबत डॉक्टर अनिल बोंडे हे कृषिमंत्री राहिलेले आहेत. कृषी क्षेत्रातले तज्ज्ञ म्हणून जरी एमबीबीएस डॉक्टर असले तरी कृषी क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत. ते आमचे उमेदवार आहेत, त्यासोबत मुन्नाजी महाडिक जे कोल्हापूरचे खासदार राहिलेत. सहकाराच्या क्षेत्रात प्रचंड मोठं स्थान आहे. ते आमचे तिसरे उमेदवार आहेत, अशा तीनही उमेदवारांचे फॉर्म आम्ही भरलेत. मला विश्वास आहे, आमचे तीनही उमेदवार निश्चितपणे निवडून येतील. आम्हाला घोडेबाजार करायचा नाही. आमचे तीन लोक निवडून येणार आहेत. त्यांनी निर्णय घेतला पाहिजे, आमचे तीन, त्यांचे तीन, त्यांनी एक उमेदवार परत घेतला पाहिजे, असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय.

तर घोडेबाजाराचा प्रश्नच येत नाही, जरी त्यांनी तिसरा उमेदवार ठेवला तरी आम्ही घोडेबाजार करणार नाही. आमचे तिन्ही उमेदवार हे भारतीय जनता पक्षातले आहेत. आमचे तीनही उमेदवार महाराष्ट्रातले आहेत. आमचे तीनही उमेदवार राजकीय क्षेत्रात पूर्णपणे सक्रिय आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे, सदसदविवेक बुद्धीने काही लोक आम्हाला मतदान करणार आहेत आणि निश्चित आमचे उमेदवार निवडून येतील. आम्ही तिसऱ्या उमेदवाराचा फॉर्म हा विचारपूर्वकच भरलेला आहे. मला विश्वास आहे, तिसरा उमेदवार आम्ही निवडून आणू, असंही त्यांनी बोलून दाखवलंय.

तसेच नरेंद्र मोदी सरकारला 8 वर्षे पूर्ण झाली, त्याबद्दल भारतीय जनतेचे आभार मानतो आणि मोदीजींच्य ासरकारचं अभिनंदन करतो. 8 वर्षांमध्ये नवभारताचं जे चित्र निर्माण केलंय, ते गरिबांपासून मध्यम वर्गीयांपर्यंत प्रत्येकाला भावलं, म्हणूनच मोदीजी जगातले सर्वात प्रसिद्ध नेते आणि मान्यता प्राप्त नेते झाले असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलंय.


हेही वाचाः संभाजीराजे छत्रपतींची ढाल करण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा फडणवीस आणि भाजपावर आरोप

First Published on: May 30, 2022 12:53 PM
Exit mobile version