निवडणूक आणि शालेय सहलीने ‘लालपरी’ ची भरभराट

निवडणूक आणि शालेय सहलीने ‘लालपरी’ ची भरभराट

ठाणे: नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आणि शालेय सहली यांच्यामुळे लालपरीची मागणी वाढली. त्यामुळे अवघ्या दहा दिवसांत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाच्या तिजोरीत ‘धनलक्ष्मी’ वास करू लागली आहे. एसटीचे या कालावधीचे उत्पन्न हे पावणेआठ कोटीच्या घरात पोहोचले आहे. ठाणे विभागाचे याच दरम्यानचे उत्पन्न २०१९ वर्षाच्या तुलनेत यंदा २० लाखांनी घसघशीत वाढल्याचे दिसत आहे. एसटी महामंडळाने शाळांना बस उपलब्ध करून देण्याचे धोरण अवलंबले असून शाळांनी मागणी केल्यास त्यांना बसेस उपलब्ध करू दिल्या जातील अशी माहिती एसटीच्या ठाणे विभागाने दिली आहे.

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये यंदा ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या. या निवडणुकीत मतदार राजाला नेण्यासाठी बसेसची मागणी झाली होती. त्यानुसार आणि पालघर जिल्ह्यातील वाडा या तालुक्यात निवडणूक साहित्य नेण्यासाठी लालपरीचा वापर केला गेला. दरम्याम कोरोना नंतर दोन वर्षांनी शालेय सहलीचे आयोजन शाळांमधून केले गेले होते. त्या सहलीसाठी खास करून लालपरी चा वापर केला गेला. त्यामुळे ११ ते २० डिसेंबर दरम्यान एसटीच्या लालपरीची मागणी खास करून वाढली. नियमित बसेस पेक्षा या कालावधीत १२५ विशेष जादा बसेसचे नियोजन केले गेले होते. त्यामुळे ११ ते २० डिसेंबर २०२२ या दहा दिवसांत एसटीच्या ठाणे विभागाचे उत्पन्न हे ७ कोटी ७६ लाख इतके उत्पन्न झाले. हे उत्पन्न प्रति किलो मीटर ४४.२ इतके असून एकूण भारमान ६५.२१ टक्के इतक्यावर पोहोचले होते.

राज्यभरात ठाणे विभागातून सरासरी ४२० ते ४२५ च्या सुमारास बसेस रोज रस्त्यांवर धावत आहेत. तर महिन्याचे सरासरी उत्पन्न हे २० ते २२ कोटी इतके आहे. त्यातच १ ते २० डिसेंबर दरम्यान ठाणे विभागाचे हे १३ कोटी २५ लाख इतक्यावर पोहोचले असून त्यातील पहिल्या नाहीतर दुसऱ्या दहा दिवसातील उत्पन्न हे ७ कोटी ७६ लाख इतके आहे. हे उत्पन्न मुळात पार पडलेल्या निवडणुका आणि सुरु असलेल्या सहलीमुळे वाढलेले आहे. अशी माहिती एसटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

 

First Published on: December 22, 2022 10:43 PM
Exit mobile version