St Workers Strike: माझ्यावर गुन्हे नोंदवून कोंडी करण्याचा प्रयत्न, जयंत पाटलांवर पडळकरांचे गंभीर आरोप

St Workers Strike: माझ्यावर गुन्हे नोंदवून कोंडी करण्याचा प्रयत्न, जयंत पाटलांवर पडळकरांचे गंभीर आरोप

मुंबईतील आझाद मैदानावरील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून माघार घेत असल्याचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले. आझाद मैदानावरील आंदोलन हे अभूतपूर्व आंदोलन झाले. कर्मचाऱ्यांचा बाजूने आजही आम्ही ठाम आहोत. त्यामुळे असं म्हणायचं कारण नाही की, आम्ही या आंदोलनापासून बाजूला जातोय. कुठेतरी आम्ही या सगळ्या विषयामध्ये सारासार महाराष्ट्राचा विचार करून दोन्ही बाजूचा विचार करून लोकप्रतिनिधी म्हणून पुढे जाण्याची आवश्यकता होतीय. म्हणून आम्ही आझाद मैदानावरील आंदोलन मागे घेतोय असे पडळकरांनी स्पष्ट केलं. तसंच या आंदोलनादरम्यान आपल्यावर अनेक गुन्हे दाखल करून सरकारकडून कशा प्रकारे दोन्ही बाजूंनी आपली कोंडी केली जातेय हे पडळकरांनी सांगितले. यावेळी त्यांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांवर गंभीर आरोप केले.

गोपीचंद पडळकर म्हणाले की, ‘सरकार दोन पाऊल पुढे आलं आहे. पण आता कर्मचाऱ्यांना दोन पाऊल पुढे यायचं की नाही हे कर्मचाऱ्यांनी ठरवावं. पण आम्ही कर्मचाऱ्यांच्या सुख-दुःखात कायम त्यांच्यासोबत असू. आम्ही अनेक आंदोलन करतो. मागे आम्ही बैलगाडीचं आंदोलन केलं. त्या बैलगाडीच्या आंदोलनामध्ये हजार, २ हजार पोलीस माझ्या मागे झेरे गावात लावले होते. माझे बंधू जिल्ह्यापरिषदेचे सदस्य आहेत, त्यांच्यावर सुद्धा एसटी आंदोलनादरम्यान गुन्हा दाखल झाला आहे. आम्हाला दोन्ही बाजूने कचाट्यात टाकलं जात आहे.’

‘जयंत पाटलांनी आमच्या विरोधात हद्दपाराची नोटीस काढली आहे. म्हणजे एकाबाजूला आम्ही लोकांच्या लढाईसाठी लढतोय आणि दुसऱ्या बाजूला आम्हा हतबल करण्याचा प्रयत्न केला जातोय. सरकार आमची दोन्ही बाजूने कोंडी करतंय. विधान परिषदेचा जेव्हा मी अर्ज भरला, तेव्हा तीन दिवस जयंत पाटलांनी महाराष्ट्रातील तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख, शरद पवार यांच्यासोबत बसून माझा अर्ज बाद करण्यासाठी टोकाचा प्रयत्न केला. वरून खालीपर्यंत तुम्ही ढुंगण घासलं. परंतु तुम्ही माझा अर्ज बाद करू शकला नाहीत. आज तुम्ही आमच्यावर दादागिरी करून एसटी आंदोलनच्या अगोदर माझ्या गाडीवरती हल्ला केला. तसेच माझ्यावर ३०७चा गुन्हा दाखल केला. आता माझा कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. आम्ही अशा कचाट्यात असूनही कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने राहिलोय. आम्हाला कितीजरी हतबल करण्याचा प्रयत्न केला, तर मल्हाराव होळकर, आहिल्याबाई होळकर, बापू बिरु वाटेगावकर यांचं रक्त आमच्यात आहे. आम्ही सरकारच्या विरोधात ताकदीने लढणार आहे. कर्मचाऱ्यांच्या सोबत आम्ही कायम उभे राहणार आहे,’ असे पडळकर म्हणाले.


हेही वाचा – St workers strike: खोत, पडळकरांची एसटी कामगार संपातून माघार; कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची दिशा ठरवावी


 

First Published on: November 25, 2021 12:57 PM
Exit mobile version