चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? असे वादग्रस्त विधान राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या वक्तव्यावर महाविकास आघाडीवरुन टीका करण्यात येत आहे. राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यपालांचा दावा खोडून काढला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्यातील भेटीचा पुरावा कुठेही नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निकालाचा संदर्भ खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. तसेच राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनीसुद्धा राज्यपालांच्या विधानावर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन राज्यपालांचे वक्तव्य खोटं ठरवलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि. १६ जुलै २०१८ रोजी दिलेल्या निकालानुसार ‘तपास अधिकाऱ्यांनी इतिहासतज्ज्ञ आणि इतर अभ्यासकांची मते विचारात घेतल्यानंतर न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांनुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही. शिवाजी महाराज आणि रामदास यांच्यामध्ये गुरुशिष्याचे नाते असल्याचा देखील कोणताही पुरावा उपलब्ध नाही.’ अशा आशयाचे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि. १६ जुलै २०१८ रोजी दिलेल्या निकालानुसार…
‘तपास अधिकाऱ्यांनी इतिहासतज्ज्ञ आणि इतर अभ्यासकांची मते विचारात घेतल्यानंतर न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांनुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही. pic.twitter.com/nA6cJKo9Rl— Supriya Sule (@supriya_sule) February 28, 2022
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरु राजमाता जिजामाता
छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण हे आदरणीय पवार साहेबांनी ( @PawarSpeaks ) स्पष्टपणे आपल्या भाषणात सांगितले आहे. ते म्हणतात,“जे लोक सांगतात की रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते, ते खोटं…रामदास शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते .शिवाजी महाराजांचे गुरु राजमाता जिजामाता होत्या. pic.twitter.com/9spBqWdhZF
— Supriya Sule (@supriya_sule) February 28, 2022
खोटा इतिहास सांगून महाराजांचा अपमान – रोहित पवार
राज्यपाल कोश्यारींच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी निषेध केला आहे. खरा इतिहास माहीत करून न घेता आपला अजेंडा रेटण्यासाठी खोटा इतिहास सांगून छत्रपतींचा अपमान केला जात असेल तर हे नक्कीच निषेधार्ह आहे आणि असं होत असताना गप्प बसणं हे त्याहून अधिक निषेधार्ह आहे. राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून, सर्वांना सोबत घेत आदर्श राज्यकारभार केला. सर्वसामान्य जनतेचं हित, हीच त्यांची निती आणि शिकवण होती. खोटा इतिहास सांगून थोर महापुरुषांचा खरा इतिहास पुसण्याचे प्रयत्न देशात इतरत्र यशस्वी होत असतीलही, परंतु महाराष्ट्रात असले प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत, हे सर्वांनी लक्षात ठेवावे असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
खरा इतिहास माहीत करून न घेता आपला अजेंडा रेटण्यासाठी खोटा इतिहास सांगून छत्रपतींचा अपमान केला जात असेल तर हे नक्कीच निषेधार्ह आहे आणि असं होत असताना गप्प बसणं हे त्याहून अधिक निषेधार्ह आहे.#राज्यपाल_माफी_मागा
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 28, 2022
राज्यपालांनी आपले वक्तव्य मागे घ्यावं – छत्रपती उदयनराजे भोसले
दरम्यान राज्यपालांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे असे भाजप नेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु होत्या. तरीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रामदास हे महाराजांचे गुरू होते असे वक्तव्य करून शिवप्रेमीसह संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. तरी राज्यपालांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे अशा आशयाचे ट्विट छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले आहे.
राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु होत्या. तरीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रामदास हे महाराजांचे गुरू होते असे वक्तव्य करून शिवप्रेमीसह संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. तरी राज्यपालांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे.
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) February 28, 2022
राज्यपाल काय म्हणाले?
चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? असे विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. तसेच छत्रपतींनी समर्थांना म्हटलं की, राज्य मला तुमच्या कृपेने मिळालंय. आपल्याकडे गुरूला गुरुदक्षिणा देण्याची परंपरा आहे. त्याच भावनेतून छत्रपती शिवाजी महाराज समर्थांना म्हणाले की, ‘या राज्याची चावी मी तुम्हाला देतो’ त्यावर समर्थ म्हणाले की, ‘ही राज्याची चावी मला कुठे देता. तुम्हीच याचे ट्रस्टी आहात” असे विधान राज्यपालांनी केले आहे. यामुळे वादाला सुरुवात झाली आहे.
हेही वाचा : राज्यपाल कोश्यारींच्या शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधानानं खळबळ