कोरोना संक्रमणाचा धोका टाळण्यासाठी मास्क वापरणे हाच उत्तम पर्याय असल्याचे जगभरातील डॉक्टर सांगत आहेत. कोरोनावर लस येत नाही, तोपर्यंत मास्क, सॅनिटाझयर आणि सोशल डिस्टसिंग हे तीन महत्त्वाचे शस्त्र मानले जातात. कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर एन ९५ आणि इतर सर्जिकल मास्कची चढ्या दराने विक्री करण्यात येत होती. त्यानंतर अखेर महाराष्ट्राने मास्कच्या दरावर नियंत्रण आणले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक रेट कार्डच उपलब्ध करुन दिले आहे. त्यानुसार आता एन ९५ मास्कची किंमत ही १९ रुपयांपासून सुरु होईल, तर जास्तीत जास्त ४९ रुपये असेल. तर दोन आणि तीन पदरी मास्क फक्त ३ ते ४ रुपयांना मिळणार आहेत. त्यामुळे तुमच्या आवडीचे मास्क आता तुम्ही विकत घेऊ शकता.
सार्वजनिक ठिकाणी, सरकारी कार्यालये, वाहतूक व्यवस्था वापरत असताना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. विनामास्क फिरणाऱ्यांवर आर्थिक स्वरुपाची दंडात्मक कारवाई करण्यात येते. मात्र आतापर्यंत मास्कच्या किंमतीवर नियंत्रण आणले जात नाही, अशी टीका सातत्याने सरकारवर होत होती. त्यामुळे मास्कच्या किंमती सर्वसामान्यांना परवडणाऱ्या असाव्यात अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली. त्यानुसार नवी नियमावली आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केली आहे.
मास्क विक्रीसाठी राज्य सरकारने निश्चित केलेली किंमत सर्व मास्क उत्पादन कंपन्या, वितरक, किरकोळ विक्रेते यांना लागू असणार आहे. सर्व मास्क उत्पादक कंपन्या, वितरक, किरकोळ विक्रेते यांनी मास्कचा दर्जा व त्याची निर्धारित कमाल विक्री किंमत दर्शनी भागावर लावणे बंधनकारक असणआर आहे. काही तक्रार उद्भवल्यास, राज्यस्तरावर आयुक्त, अन्न व औषध प्रशासन व जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी हे तक्रार निवारणासाठी सक्षम प्राधिकारी असतील, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.