तानसा नदीवरील डाकीवली पुलाला भगदाड

तानसा नदीवरील डाकीवली पुलाला भगदाड

डाकीवली पुलाला मधोमध भगदाड पडल्याने वाहतूक जुन्या पुलावरून सुरू आहे.

वाडा-भिवंडी मार्गावरील डाकीवली गावाजवळ तानसा नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाला मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे पुलाच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. सध्या या पुलावरील वाहतूक बंद करून जवळच्या जुन्या पुलावरून सुरू ठेवण्यात आली आहे.

तानसा नदीवर काही वर्षांपुर्वी बांधण्यात आलेल्याला या नव्या पुलावर मोठे भगदाड पडले आहे. त्यात पाणी साचले आहे. हे भगदाड प्लास्टिक आणि प्लायवूडने झाकण्यात आले आहे. या पुलावरील वाहतूक बंद करून जवळच्या जुन्या पुलावरून सुरू ठेवण्यात आली आहे.

या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक मोटारसायकलस्वारांचे अपघात झाले आहेत. तर काही मृत्यूमुखी पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. वाडा-भिवंडी मार्गाची दुरावस्था आणि जीवघेणे खड्डे हे समीकरण या महामार्गाला बनले आहे. ‘सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीच्या ठेकेदारांकडून रस्त्याची थातूर-मातूर डागडुजी होते. पुन्हा तेच खड्डे उखडले जातात.

या रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत विविध पक्षांनी आवाज उठवला आहे. गेल्याच आठवड्यात श्रमजीवी संघटनेने रस्त्यावरील खड्डयांमध्ये झाडे लावा आंदोलन केले होते. त्यानंतर डागडुजीला सुरुवात झाली असतानाच आता पुलावर मोठे भगदाड पडल्याची घटना घडली आहे.

वाडा-भिवंडी रस्त्यावरील डाकीवलीचा पूल बीओटी तत्त्वावर सुप्रीम कंपनीने बांधला आहे. संबंधित कंपनीला निर्देश दिल्यानंतर तातडीने त्या पुलावरील भगदाड दुरुस्त करण्यात आले आहे. त्याबाबतचा अहवाल शासनाला पाठवण्यात येणार आहे. – आर. एस. पवार, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम, विभाग जव्हार

First Published on: July 30, 2019 4:42 AM
Exit mobile version