कोकणवासियांचा कोरोना चाचणीमुळे ST ला बायपास

कोकणवासियांचा कोरोना चाचणीमुळे ST ला बायपास
गणेशोत्सवाला कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी एसटीने १३ ते २१ ऑगस्टपर्यंत मुदत वाढ दिली होती.मात्र प्रवास करणार्‍या चाकरमान्यांना कोरोनाची चाचणी अनिवार्य केल्याने चाकरमान्यांनी एसटीकडे पाठ फिरवली आहे. गुरुवारी एक आणि शुक्रवारी दोन अशा फक्त तीनच प्रवाशांनी एसटीचे आरक्षण केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोकणात एसटी गाडया सोडण्याचा नियोजनाचे तीन तेरा वाजले आहेत. याला कारणीभूत परिवहनमंत्री अनिल परब असल्याची टीका एसटी कामगारांनी केली आहे.

चाकरमान्यांनी एसटीकडे फिरवली पाठ

गौरी-गणपतीच्या उत्सवाला ६ ऑगस्टपासून कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी एसटीने मुंबई, ठाणे, पालघर येथील प्रमुख बस स्थानकांवरून बसेस सुरु केल्या आहेत. ६ ऑगस्ट ते १२ ऑगस्टपर्यंत ११ हजार पेक्षा जास्त प्रवाशांनी एसटीचे आगाऊ आरक्षित केले होते. तर या सहा दिवसांत ४०६ बसेस मुंबई विभागातून कोकणात रवाना झाल्या आहेत. एसटीतून तब्बल ८ हजार पेक्षा जास्त प्रवाशांनी कोकण गाठले आहे.  गणेशोत्सावासाठी कोकणात जाणार्‍या नागरिकाकरिता एसटीची ही सुविधा फक्त ६ ते १२ ऑगस्ट अखेरपर्यंत होती. मात्र आता प्रवासी संख्या लक्षात घेता एसटी महामंडळाने  मुदत वाढविण्यात आली आहे. आता १३ ते २१ ऑगस्टपर्यंत कोकणात चाकरमान्यांना जाण्यासाठी शासनाच्यानिर्देशानुसार एसटी बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. मात्र १३ ऑगस्टपासून एसटी बसने कोकणात जाण्यार्‍या प्रवाशांना प्रवासापूर्वी कोरोनाचाचणी करणे अनिवार्य असून सदर चाचणी निगेटिव्ह असल्यास संबंधितांना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. आरक्षण केल्यानंतर प्रवासापूर्वी संबंधित प्रवाशाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यास त्यांना आरक्षण रद्द करता येणार नाही. त्यामुळे अनेक चाकरमान्यांनी एसटीचा प्रवासाकडे पाठ फिरवली आहे. आता १३ ऑगस्टला ही सेवा सुरुवाताच पहिल्याच दिवशी एकच प्रवाशांनी आरक्षण केले होते. मात्र कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांची कोकणात जाण्याची तिकीट एसटी महामंडळाला रद्द करावी लागली आहे. एसटीचा या मुदत वाढीच्या पुर्णत: फियास्को झालेल्या आहे.

एकही प्रवासी नाही

१३ ते २१ ऑगस्टपर्यंत कोकणात चाकरमान्यांना जाण्यासाठी शासनाच्यानिर्देशानुसार एसटी बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. ज्यामध्ये मुंबई विभागातून मुंबई- चिपळुण, मुंबई-गुहागर, मुंबई- खेड, मुंबई- रत्नागिरी, परळ- देवरूख, परळ- लांजा, कुर्ला नेहरु नगर -कणकवली आणि कुर्ला नेहरु नगर – राजापूरसाठी एसटी बसेस धावणार आहेत. मात्र १३ ऑगस्टला फक्त कुर्ला नेहरु नगर – राजापूरसाठी एकाच प्रवाशाने आरक्षण केले होते. मात्र त्यांचीसुध्दा तिकीट रद्द करण्यात आली आहे. तर १५ ऑगस्ट एकाही प्रवाशांनी आरक्षण केलेले नाही.

रेल्वेचा आता एसटी फटका

मिळालेल्या माहितीनुसार १३ ते २१ ऑगस्टदरम्यान फक्त ३२ प्रवाशांनी आरक्षण केले आहे. सर्वाधिक आरक्षण हे १३ प्रवाशांनी १९ ऑगस्टचे केले आहे. आता तर कोकणासाठी रेल्वे गाड्यांची घोषणा केली आहे. त्यातसुध्दा प्रवासादरम्यान कोरोना चाचणी अट नाही. त्यामुळे आता कोकणात जाणारे प्रवासी आता रेल्वेने जाण्याचा तयारीत आहेत. त्यामुळे रेल्वेच्या आता फटका एसटी महामंडळाला बसणार आहे.

First Published on: August 14, 2020 7:30 PM
Exit mobile version