…तर उद्धव ठाकरेंच्या विजयाचे रस्ते बंद होतील, राऊतांच्या पदयात्रेवरून आशिष शेलारांचा घणाघात

…तर उद्धव ठाकरेंच्या विजयाचे रस्ते बंद होतील, राऊतांच्या पदयात्रेवरून आशिष शेलारांचा घणाघात

मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज जम्मूमध्ये राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत पायी वारी केली. यावरून भाजपा नेते आशीष शेलार यांनी राऊतांवर टीकास्त्र डागलं आहे. संजय राऊत जितकी पावलं चालतील, तितकी उद्धवजींच्या विजयाचे रस्ते बंद होतील, असं आशिष शेलार म्हणाले. आज पत्रकार परिषद घेत त्यांनी राऊतांवर टीका केली.

हिंदुत्वासाठी राम जन्मभूमीचा लढा जेव्हा लाखो कारसेवक लढत होते, तेव्हा संजय राऊत प्रभादेवीच्या गल्लीत बसून होते. 370 कलममुक्त काश्मीर व्हावे यासाठी असंख्यजण संघर्ष करीत होते, बलिदान देत होते, तेव्हा खा. संजय राऊत मुंबईत बसून माध्यमांसमोर “ध्वनी प्रदूषण” करीत होते. देव, देश आणि धर्माच्या संघर्षातून गायब असलेले खा.संजय राऊत, काँग्रेसच्या युवराजांसोबत चालायला गेले! संजय राऊतांनी बिनाडर गांधींसोबत चालावं. ते जितकी पावलं चावलतील तितके उद्धवजींच्या विजयाचे रस्ते बंद होतील, असा हल्लाबोल आशिष शेलार यांनी केला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा अंतिम टप्पा सुरू आहे. भारत जोडो यात्रा सध्या जम्मूमध्ये असून या टप्प्यात शिवसेना खासदार संजय राऊतही सामिल झाले. जम्मूचे तापमान ५ अंश सेल्सिअस असून तिथे पावसाची संततधार आहे. अशा वातवरणातही संजय राऊत यांनी १२ किमीची पदयात्रा केली आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

संजय राऊत यांच्या हृदयात सहा स्टेन्स आहेत. अशा परिस्थितीतही संजय राऊत यांनी रेनकोट न घालताही राहुल गांधी यांच्यासोबत पायवारी केली. 5 अंश सेल्सिअस तापमान, पावसाची संततधार आणि गळ्यात भगवी मफरल घालून राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांसोबत संजय राऊत यांनी १२ किमी पदयात्रा केली.

First Published on: January 20, 2023 3:35 PM
Exit mobile version