खुशखबर! तुळशी तलाव भरून वाहू लागला

खुशखबर! तुळशी तलाव भरून वाहू लागला

तुळशी तलाव ओसंडून वाहतयं (प्रातिनिधिक चित्र)

संततधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालं असलं तरी मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी एक असलेला तुळशी तलाव भरून ओसंडून वाहत आहे. मुंबई आणि उपनगरांत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तुळशी तलावात मात्र वाढ झाली आहे. हा तलाव तुडुंब भरला असून सोमवारी सकाळी ७.३० वाजल्यापासून हा तलाव ओसंडून वाहू लागल्याची माहिती पालिकेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आली आहे. गेल्या वर्षी हा तलाव १४ ऑगस्ट रोजी भरला होता. यंदा जून आणि जुलै महिन्यातही दमदार पाऊस झाल्याने एक महिना आधीच तुळशी तलाव भरला आहे.

५४ टक्के पाऊस पडला

यंदाच्या मान्सूनमध्ये ५४ टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून मागील २० दिवसांच्या पावसांची नोंद घेत ही सरासरी टक्केवारी हवामान खात्याने दिली आहे. सध्याच्या स्थितीत शहरामध्ये एकत्रित केलेले पावसाचे पाणी अंदाजे ३७ हजार ५५० दशलक्ष लीटर इतके असून हे तुळशी आणि विहार तलावात झालेल्या ३५ हजार ७४४ दशलक्ष लीटरच्या साठवणी क्षमतेच्या बरोबरी इतके आहे. यंदाच्या पावसाळ्यात १०० टक्के सरासरी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. त्यानुसार ५४ टक्के म्हणजे अर्ध्याहून अधिक पाऊस पडल्याची माहिती समोर येत आहे.

ठळक मुद्दे 

First Published on: July 9, 2018 8:15 PM
Exit mobile version