महावितरणचा हलगर्जीपणा दोन शेतकर्‍यांच्या जीवावर

महावितरणचा हलगर्जीपणा दोन शेतकर्‍यांच्या जीवावर

तालुक्यातील आमशेत गावाच्या हद्दीत चारा कापण्यास गेलेल्या दोन शेतकर्‍यांना विजेच्या तारेचा धक्का लागून त्यात त्यांचा मृत्यू झाला. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला. गवतावर पडलेली विजेची प्रवाहित तार लक्षात न आल्याने तिचा धक्का लागून दोघांना नाहक जीव गमवावा लागला. त्यामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

बिरवाडी वेरखोल येथील महादेव गणपत पवार (५०) आणि संकेत चंद्रकांत तांबे (३५) बुधवारी सकाळी हिरवा चारा कापण्यासाठी अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रातील सँडोज कंपनीसमोर असलेल्या रस्त्यापलीकडे 7.30 च्या सुमारास गेले होते. बराच वेळ परत न आल्याने नातेवाईक आणि ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेतला. त्यावेळी गवतामध्ये पूर्णपणे जळून काळे ठिक्कर पडलेले दोघांचे मृतदेह आढळले. याच ठिकाणी वीज प्रवाहित तारही पडलेली होती.

दोघांच्या हातामध्ये कापलेला चारा आणि चारा कापण्याचे विळे होते. या घटनेनंतर गावकरी संतप्त होऊन जमा झाले. यामुळे तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. दोघांच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे. स्थानिक आमदार भरत गोगावले, माजी आमदार माणिक जगताप यांनी तेथे भेट दिली.

दरम्यान, ग्रामस्थांच्या तक्रारीनंतरही महावितरणने दुर्लक्ष केल्याने निष्पाप शेतकर्‍यांचा बळी गेल्याचा आरोप माणिक जगताप यांनी पत्रकार परिषदेत केला. संबंधित बेजबाबदार अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

First Published on: October 17, 2019 6:27 AM
Exit mobile version