‘मविआ’तील घटक पक्षांनीच आपल्या मित्रांचे हित सांभाळायचे – उद्धव ठाकरे

‘मविआ’तील घटक पक्षांनीच आपल्या मित्रांचे हित सांभाळायचे – उद्धव ठाकरे

‘महाविकास आघाडीतील पक्षांनी आपापल्या मित्र पक्षांचे हित आपण सांभाळायचे, असे आमचे ठरले. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचे घटक पक्ष असतील’, असे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. बाळासाहेबांच्या जयंतीच्या मुहूर्तावर शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची आज युती झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. (Uddhav Thackeray Talk On Shiv Sena and vanchit bahujan Aghadi alliance)

“प्रकाश आंबेडकर आणि आम्ही एकत्र येण्याचा निर्णय काल-परवा नाही घेतला. या युतीबाबत मी याआधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर मित्रपक्षांसोबत बोललो होतो. तेव्हा मविआकडून वंचितसाठी नकार आला नाही. त्यानंतर आम्ही असे ठरवले की, महाविकास आघाडीतील पक्षांनी आपापल्या मित्र पक्षांचे हित आपण सांभाळायचे. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचे घटक पक्ष असतील”, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

हिंमत असेल तर निवडणुका घ्याव्यात

“आम्ही निवडणुका घ्या हे फार अगोदरपासून सांगतो आहे. लवकरात लवकर यांनी निवडणुका घ्याव्यात. त्यानंतर आम्ही जागा वाटपाचे ठरवू. जागा वाटप कसे असतील हा आमचा प्रश्न आहेच. तो विचार करूनच आम्ही एकत्र आलोय. आमचे या गद्दारांना आव्हान आहे, हिंमत असेल तर लवकरात लवकर निवडणुका घ्या”, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

“प्रकाश आंबेडकर यांनी त्यांचे आणि शरद पवार यांच्यासोबत असलेले संबंध सांगितले. आमचेही तीन वर्षापूर्वीपर्यंत तसे संबंध होते आणि ते जगजाहीर आहे. परंत, ज्यावेळेला फसवणुकीचे राजकारण सुरू आहे, हे जेव्हा आमच्या लक्षात आलं. त्यावेळेला आम्ही निर्णय घेतला. त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येतील का? तीन पक्ष एकत्र आल्यास आघाडी यशस्वी होईल का? असे अनेक प्रश्न सातत्याने पडत होते”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.


हेही वाचा – ठाकरे-आंबेडकर युती : कसा असे फॉर्म्युला? उद्धव ठाकरे म्हणाले…

First Published on: January 23, 2023 3:28 PM
Exit mobile version