नगर जिल्ह्यात आगळावेगळा निसर्ग विवाह

नगर जिल्ह्यात आगळावेगळा निसर्ग विवाह

लग्न म्हटलं की,बडेजावपणाचा सोहळा, थाटमाट आलाच. आता तर लग्न करायचं तर एखाद्या सुंदर ठिकाणी म्हणजे ‘डेस्टिनेशन वेडिंग करण्याचा सध्या फॅड आलं आहे. पण माडवेगावात झालेल्या एका लग्नाचं डेस्टिनेशन ऐकलंत तर तुम्हाला सुध्दा आश्चर्य वाटेल. हे लग्न निर्सगपूजा करुन आणि कल्पवृक्षाच्या साक्षीने एकमेकांच्या गळ्यात झाडांच्या पानांचा हार घालून त्यांच्याच भोवती सात फेरे घेत आगळावेगळा लग्नसाहेळा माडवेगावातील वनात झालेला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील माडवे गावातील प्राध्यापक प्रमोद पवार यांनी शुक्रवारी आपल्या गावातील आनंदवनात कल्पवृक्षाच्या साक्षीने आपला लग्नसाहेळा करुन महाराष्ट्रासमोर एक नविन आदर्श ठेवला आहे. प्रमोद हा ताडावाडीतील एका शेतमुजराचा मुलगा आहे. घरची आर्थिक परिस्थिती अत्यत बेताची असताना सुध्दा आपल्या बृध्दीच्या जोरावर शिक्षण पूर्ण केले असून आता गोव्यातील पार्वतीबाई चौगुले स्वायत्त महाविद्यालयात गेली सहा वर्षे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. प्रमोद हा निसर्गप्रेमी असून गोवा आणि संपूर्ण महाराष्ट्रात निसर्गाच्या स्वरक्षण आणि संवर्धनासाठी व्याख्याने आणि समाजसेवेचे कार्य करत आहे. त्यांच्या या कार्यासाठी अनेक पुरस्कार सुध्दा देण्यात आले आहे. गेल्या एक वर्षापासून तो लग्नासाठी निसर्गावर प्रेम करणारी वधु शोधत होता. त्याला पुण्यात शुंभागी राठोडच्या रुपात वधु भेटली. शुंभागीने डीवाय पाटीलमधून एमएससीचं शिक्षण घेतले असून ती निसर्गप्रेमी आहे. या दोघांनी लग्न करण्याचे ठरवले. समाजातील रुढी परंपरेला छेद देत त्यांनी थेट माडवेगांवाती आनंदवनात जाउन 7 जानेवारी 2021 रोजी लग्न केले आहे.

असे झाले लग्न

प्रमोद आणि शुभांगी हे शुक्रवारी एकामेकाचे हात धरुन आपल्या कुटुबियांबरोबर आनंदवनात गेले. तिथे त्यांनी सर्वप्रथम कल्पवृक्षाजवळ जाऊन दीपप्रज्वलन केले. त्यानंतर या लग्न सोहळ्याला सुरुवात झाली. कल्पवृक्षाच्या साक्षीने एकमेकांच्या गळ्यात पानांचा हार घालून झाडाच्या भोवती सात फेर्‍या घेऊन आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचे वचन दिले. त्यानंतर वृक्ष लागवड करुन निसर्गऋण व्यक्त करण्यात आले.

अडीच हजार झाडे

प्राध्यापक प्रमोद पवार यांनी दैनिक आपलं महानगरला सांगितले की, माडवेगावातील नागरिकांनी स्वत:हून गेल्या तीन वर्षांपूर्वी निसर्गाच्या संवर्धनासाठी वृक्ष लागवडीसाठी वनखात्यातील 17 एकर जमीन मागीतली होती. त्या जमिनीवर ताडातील नागरिकांनी अडीच हजारपेक्षा जास्त वृक्षांची लागवड केली आहे. याचे नाव आनंदवन ठेवण्यात आले आहे. मी सुध्दा या आनंदवनात कल्पवृक्षाच्या साक्षीने लग्न करण्याचे ठरवले होते.

कोरोना विषाणू हवेतून पसरतो आहे.त्यामुळे एक प्रकारची कोरोना ही नैसर्गिक आपत्ती आहे. त्यामुळे निसर्ग पुजेला आज प्राधान्य देणे गरजेचे आहे. जर आज आपण सर्वांनी निसर्गपूजेला प्राधान्य दिले आणि निसर्गाच्या स्वरक्षण आणि संवर्धनासाठी प्रयत्न केले तर येणार्‍या पिढीला त्याचा फायदा होईल. त्यामुळे समाजात एक चांगला मेसेज जाण्याकरिता आम्ही कल्पवृक्षाच्या साक्षीने लग्न केले आहे.
– प्रमोद पवार, प्राध्यापक, माडवे गाव

आज समाज भौतिक सुखात अडकतोय. परंतु ज्याने आपल्याला निःस्वार्थपणे जगायला शिकवलं त्या निसर्गाला विसरु लागलो आहोत. या सगळ्यांची चर्चा होणार्‍या जोडीदाराशी झाली आणि त्यांनीही एक कल्पना सुचविली. निसर्गाच्या सान्निध्यात ज्या ठिकाणी झाडे, फुले, पक्षी व निरव शांतता असेल तिथे विवाहसोहळा करण्याचे ठरविले. हा एक आदर्श निर्माण व्हावा व निसर्गाशी एकरूप होऊन आपणही हा मुक्तपणे आनंद घ्यावा हा उद्देश सफल झाला. – शुभांगी राठोड, पुणे

First Published on: January 10, 2021 11:58 PM
Exit mobile version