३०० कोटींची लाच देऊ करणारा संघाचा तो व्यक्ती कोण?; अतुल लोंढे यांचा सवाल

३०० कोटींची लाच देऊ करणारा संघाचा तो व्यक्ती कोण?; अतुल लोंढे यांचा सवाल

जम्मू काश्मीरचे राज्यपाल म्हणून कार्यरत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत एका व्यक्तीने अंबानी यांच्या फाईलला मंजुरी देण्यासाठी आपल्याला ३०० कोटींची लाच देण्याचा प्रस्ताव होता, असा गौप्यस्फोट मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केल्यानंतर मलिक यांना कोट्यवधी रुपयांची लाच देऊ करणारा संघाशी निगडीत तो व्यक्ती कोण ? असा सवाल प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी शनिवारी केला.

राज्यातही फडणवीस सरकारच्या काळात विविध मंत्र्यांच्या कार्यालयात नियुक्त केलेले संघाचे लोक वसुली आणि फाईली क्लिअर करण्यासाठीच नेमले होते का? याची चौकशी महाविकास आघाडी सरकारने करावी, अशी मागणीही लोंढे यांनी केली.

यासंदर्भात बोलताना लोंढे पुढे म्हणाले की, सातत्याने भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे आणि इतर पक्षातील नेत्यांची बदनामी करणे ही संघ आणि भाजपची कार्यपद्धती आहे. विरोधी पक्षांतील नेत्यांवर चिखलफेक करून आपला जातीय, धर्मांध आणि भ्रष्ट चेहरा लपवण्याचे काम संघ आणि भाजपाकडून सुरु असते हे किरीट सोमय्या प्रकरणातून संपूर्ण महाराष्ट्र पाहतो आहे. गल्ली पासून दिल्लीपर्यंत भ्रष्टाचाराबाबत गळा काढून ओरडणाऱ्या संघ आणि भाजपचा खरा चेहरा सत्यपाल मलिक यांनी जनतेसमोर आणला आहे. त्यामुळे ३०० कोटी रूपयांच्या लाचेचा प्रस्ताव देणारा संघाचा तो व्यक्ती कोण आहे? याचा खुलासा संघानेचकरावा, अशी मागणीही लोंढे यांनी केली आहे.

राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांच्या कार्यालयात संघाशी निगडीत लोकांच्या नियुक्त्या केल्या होत्या. यापैकी अनेक जण बदल्या आणि फाईली क्लिअर करण्यासाठी मोठे व्यवहार करत असल्याची चर्चा त्यावेळी होत होती. मलिक यांच्या वक्तव्याने या चर्चेला पुष्टी मिळाली असून महाविकास आघाडी सरकारने याची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी लोंढे यांनी केली आहे.

 

First Published on: October 23, 2021 8:18 PM
Exit mobile version