तर पवारांची ‘औलाद’ सांगणार नाही – अजित पवार

तर पवारांची ‘औलाद’ सांगणार नाही – अजित पवार

लोकसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. यावेळी शिरूर मतदारसंघावरून माजी उपमुख्यमंत्री आणि आमदार अजित पवार यांनी थेट शिवसेना खासदार शिवाजी आढळराव यांनी आव्हान दिलं आहे. ‘मी शिरुर लोकसभा लढण्यास इच्छुक असुन, पवार साहेबांनी आदेश दिला तर निवडुनच येणार नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही’ अशा शब्दात अजित पवार यांनी शिवाजी आढळराव यांनी आव्हान दिलं आहे. शिरूरमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.

आणखी काय म्हणाले अजित पवार?

‘शिरूर लोकसभा, विधानसभेला काय गंमत होते ते कळत नाही. आपल्याकडून शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांविरोधात कुणीही उभे राहिले तरी निवडून येतील. अशी स्थिती आहे. मग मागे का सरायचे? मी कालच पवार साहेबांना सांगितले की, शिरूर लोकसभेसाठी तुम्हाला योग्य उमेदवार मिळत नसेल, तर माझी लढायची तयारी आहे. हयगय करणार नाही. या मतदार संघासाठी पक्ष जी जबाबदारी देईल, ती उचलायची माझी तयारी आहे. मी आज सांगतो मी येथून उमेदवारीचा फॉर्म भरला; तर शंभर टक्के निवडून येईल. त्याशिवाय पवारांची औलाद सांगणार नाही. मी जे बोलतो, ते करतोच, हे लोकांना चांगलंच माहिती आहे. त्यामुळे पक्ष जो आदेश देईल, तो शिरसावंद्य मानून काम करू.’ असं अजित पवार यांनी म्हटलं

मी भागाचा खासदारच होतो. आता आमच्या सहकाऱ्यांना म्हटले तुम्ही खासदार व्हा; तर ते म्हणतात, नको राव, दादा मला आमदारच करा, हे काय कामाचे ? असा सवाल करून ते म्हणाले, ‘अरे आमदार एका तालुक्‍याचा. तर, खासदाराच्या हातात सहा तालुके असतात. पण नकोच, म्हटल्यावर काय करायचे? मी खासदार होतो. पवार साहेबांसाठी हा मतदारसंघ खाली करून देण्याची सूचना तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी केल्यावर क्षणात राजीनामा दिला. परत आमदार झालो, नंतर मंत्री, उपमुख्यमंत्री देखील झालो. तुमचे नशीब असेल; तर तुम्हीही असे पुढे जाऊ शकता. फक्त त्यासाठी धाडस महत्वाचे असून, पक्ष देईल ती जबाबदारी उचलायची तयारी ठेवावी लागेल.’

First Published on: January 7, 2019 11:22 AM
Exit mobile version