१०१ रिक्षाचालकांचे लायसन्स रद्द

१०१ रिक्षाचालकांचे लायसन्स रद्द

वडाळा आरटीओची मोठी कारवाई

जवळचे भाडे नाकारणे, प्रवाशांना मुजोरीने अव्वाच्या सव्वा भाडे आकारणे असा मनमानी कारभार रिक्षाचालकांचा सुरू आहे. अशा मुजोर रिक्षाचालकांच्या मुसक्या आवळण्यासाठी आरटीओ विभागाने मोहीम सुरू केली आहे. मार्च महिन्यातील १३ दिवसांत अशा १०१ रिक्षाचालकांचे लायसन्स वडाळा आरटीओने रद्द केले आहे.

मुंबईमध्ये रिक्षांचे जाळे मोठे आहे. अनेक प्रवासी रिक्षा प्रवासालाही तितकेच प्राधान्य देत असतात. रेल्वे स्टेशन ते घर या प्रवासादरम्यान मोठ्या संख्येने मुंबईकर रिक्षाचा पर्याय निवडत असतात, परंतुु रिक्षाचालक जवळचे भाडे नाकारतात किंवा जास्त भाडे आकारतात. त्यामुळे प्रवासी आणि रिक्षाचालकांमधील वाद वाढले आहेत.

काही दिवसांपूर्वी जादा भाडे आकारण्यावरून अशाच एका प्रवाशाला रिक्षाचालकाने मारहाण केली होती. त्यानंतर आरटीओने अरेरावी करणार्‍या रिक्षाचालकांविरुद्ध कडक कारवाई करण्यास सुरुवात केली. वडाळा आरटीओने जानेवारी ते १३ मार्च दरम्यान ५३६ रिक्षा तर १०१ टॅक्सीची तपासणी केली आहे. त्यामध्ये भाडे नाकारल्याप्रकरणी ३०१ रिक्षा तर १० टॅक्सीचालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. यातील २०० रिक्षाचालकांना नोटिसादेखील बजावण्यात आल्या आहेत, तर इतर प्रकरणांमध्ये २३५ रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई झालेली आहे.

१ मार्चपासून १०१ रिक्षाचालकांचे लायसन्स रद्द करण्यात आले आहे. प्रवासी हे टोल फ्री क्रमांक आणि अ‍ॅपद्वारे आपल्या तक्रारी आरटीओकडे करतात. भाडे नाकारणे, जादा भाडे आकारणे यासंबंधी १८० तक्रारी वडाळा आरटीओकडे प्राप्त झालेल्या आहेत. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत. घाटकोपर, कुर्ला, चेंबूर या भागात भाडे नाकारण्याच्या आणि जादा भाडे आकारण्याच्या सर्वाधिक तक्रारी असल्याचे वडाळा आरटीओतील अधिकार्‍यांनी सांगितले.

First Published on: March 18, 2019 4:26 AM
Exit mobile version