याला मंदी म्हणायचे की अजून काही…

याला मंदी म्हणायचे की अजून काही…

महागड्या आलिशान गाड्या तयार करणार्‍या मर्सिडीज बेंझ या जगातल्या अव्वल कार कंपनीने देशभरात एकाच दिवशी 200 गाड्या विकल्या आहेत. एकट्या मुंबईतच दसर्‍याच्या सव्वाशे मर्सिडीज गाड्यांची डिलीव्हरी झाली असल्याची माहिती कंपनीकडून मिळाली आहे. जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर भारतात ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये मरगळ आल्याच्या बातम्या येत असतानाच मर्सिडीज बेंझची मात्र याच काळात भारतीय बाजारपेठेत विक्रमी विक्री झाली आहे. विशेष म्हणजे जून ते सप्टेंबर या 9 महिन्यात टाटाची नॅनो गाडी एकच विकली गेली. कंपनीला त्यामुळे उत्पादन बंद ठेवावे लागले. फक्त फेब्रुवारीमध्ये एकच नॅनो विकली गेली. टाटा मोटर्सने नॅनो कारच्या एकाही युनिटमध्ये कारचे उत्पादन केलेले नाही. असे असले तरी या कंपनीने कारचे उत्पादन बंद झाल्याची अधिकृत घोषणा केलेली नाही.

वाहन क्षेत्रातल्या टाटा, मारुतीसारख्या कंपन्यांना मंदीचा जबर फटका बसत असतानाच आलिशान कारच्या विक्रीवर मात्र परिणाम झालेला दिसत नाही. वाहनविक्रीत 30 टक्क्यांनी घट झाल्याची बातमी गेल्याच महिन्यात आली होती. केंद्र सरकारनेसुद्धा ऑटोमोबाईल सेक्टरमधल्या मंदीसदृश परिस्थितीची दखल घेऊन वाहनउद्योगासाठी काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या होत्या. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पॅकेजही जाहीर केले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर मर्सिडीजसारख्या आलिशान आणि महागड्या गाड्यांची एवढी विक्री वाढल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मर्सिडिजला अच्छे दिन

मर्सिडीज कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षीसुद्धा कंपनीला मुंबई आणि गुजरामधून चांगला प्रतिसाद मिळाला होता. फेस्टीव्ह सीझनमध्ये गाड्यांची चांगली विक्री झाली होती. मर्सिडीज क्लास सी आणि क्सास इ गाड्यांची विक्री जास्त झाली आहे. शिवाय नव्याने लाँच केलेल्या GLC आणि GLE या SUV गाड्यांनाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे कंपनीने सांगितले. C class आणि E class गाड्यांना मुंबईतून मोठी मागणी आहे. नवरात्रीच्या काळात या गाड्यांच्या ऑर्डर नोंदवण्यात आल्या आणि दसर्‍याला डीलिव्हरी देण्यात आली. गुजरातमध्ये 74 गाड्यांची डीलिव्हरी देण्यात आली.

First Published on: October 10, 2019 1:33 AM
Exit mobile version