पहिल्या २४ तासांत ३१ टक्के कोरोना रुग्णांचा मृत्यू ; उपचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात मृत्यू टाळणे गरजेचे

पहिल्या २४ तासांत ३१ टक्के कोरोना रुग्णांचा मृत्यू ; उपचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात मृत्यू टाळणे गरजेचे

कोरोना व्हायरस

मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असली तरी हॉस्पिटलमध्ये रुग्ण दाखल झाल्यानंतर २४ तासांमध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण ३१ टक्के असल्याचे मुंबई कोरोना मृत्यू विश्लेषण समितीने राज्य सरकारला सादर केलेल्या तिसर्‍या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे अद्यापही कोरोना रुग्णांना वाचवण्यासाठी अधिक काळजी घेणे अपेक्षित असल्याचे अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.

मुंबईमध्ये आतापर्यंत तब्बल १ लाख ४० हजार ८८२ कोरोना रुग्ण सापडले असून, त्यातील १ लाख १३ हजार ५७७ रुग्ण बरे झाले आहेत. यातील ७ हजार ५३२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांपैकी ५ हजार २०० मृतांची तपासणी कोरोना मृत्यू विश्लेषण समितीकडून करण्यात आली. यामध्ये या तपासणीमध्ये तब्बल ३१ टक्के कोरोना रुग्णांचे मृत्यू हे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर २४ तासांमध्ये झाले तर ५९ टक्के रुग्णांचे मृत्यू हे पुढील चार दिवसांमध्ये झाले असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे ज्या रुग्णांनी लक्षणे जाणवत आहेत. त्यानंती कोणताही विलंब न करतात तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल होणे गरजेचे आहे. उपचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यातच कोरोना रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याच्या सूचना अहवालामध्ये मांडण्यात आल्या आहेत. त्याबरोबर सध्या कोरोना रुग्णांना देण्यात येणारी अनेक औषधांचा फारसा परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे उपचार पद्धतीमध्ये बदल करण्याची आवश्यकता असल्याचेही या अहवालामध्ये म्हटले आहे. कोरोना रुग्णांना महागडे औषध देताना त्याचा योग्य वेळी वापर केल्यास त्याचा परिणाम होतो. अन्यथा त्याचा परिणाम फारसा होत नसल्याने रुग्णांना इन्टेसिव्ह सपोर्टिव्ह थेअरी, ऑक्सिजन, प्रोनिग थेरपीवर भर देत फिजिओथेरपीला प्राधान्य द्यावे, कोरोना रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका यांच्याशी नियमित संवाद साधून त्यांना आवश्यक सचूना देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कोरोनासंदर्भात विविध निर्णय, परिस्थिती याची माहिती डॉक्टरांना नियमित देणे आवश्यक असल्याचेही अहवालामध्ये म्हटले असल्याची माहिती कोरोना मृत्यू विश्लेषण समिती प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.

तरुणांनी काळजी घेणे गरजेचे

कोरोनाचा सर्वाधिक धोका हा वयोवृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांना आहे. मात्र सध्या ५० वयोगटापेक्षा कमी वयोमर्यादा असलेल्या अनेक व्यक्तींना लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब यासारख्या अनेक आजार असतात. त्यामुळे अशा तरुणांनी स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता अधिक काळजी घेणे आवश्यक असल्याचेही या अहवालामध्ये नमूद केले असल्याचे माहिती कोरोना मृत्यू विश्लेषण समिती प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी दिली.

First Published on: August 28, 2020 6:48 PM
Exit mobile version