भारतातील ४२ कोटी मुलांचं होणार गोवर-रुबेला लसीकरण

भारतातील ४२ कोटी मुलांचं होणार गोवर-रुबेला लसीकरण

गोवर-रुबेला लसीकरण

भारतातील गोवर-रुबेला हा आजार आणि त्याबाबतची भिती कमी करण्यासाठी येत्या २७ नोव्हेंबरला संपूर्ण भारतात गोवर-रुबेला लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. भारत सरकारने २०२० सालापर्यंत गोवर या आजाराचे पूर्णपणे निर्मूलन आणि रुबेला या आजाराचं नियंत्रण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे ही लस आपल्या मुलांना कुठलीही भिती न बाळगता द्यावी या हेतूने मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र राज्याने कंबर कसली आहे.

गोवरमुळे दरवर्षी ५० हजार बालकांचा मृत्यू

गोवर हा अत्यंत संक्रमित आणि घातक आजार असून जो मुख्यत: मुलांना होतो. या आजाराने दरवर्षी भारतात सरासरी एकूण ५० हजार बाळ मृत्यूमुखी पडतात. तर, रुबेला हा आजार सौम्य संक्रामक असून जो मुलांना आणि प्रौढ व्यक्तींना ही होतो. पण, जर गर्भवती स्त्रियांना रुबेला या आजाराचा संसर्ग झाला तर या आजाराने मुलांना जन्मजात दोष जसे की अंधत्व, बहिरेपणा आणि हृदयविकृती होऊ शकते. अशा प्रकारे दरवर्षी एकूण ४० हजार बाळ रुबेला आजाराने जन्म घेतात.

१० हजार मुलांना लस दिली

या मोहिमेत ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील मुलांचा समावेश करण्यात येणार असून भारतातील ४२ कोटी मुलांना लसीकरण केलं जाणार आहे. शिवाय, आतापर्यंत १० कोटी मुलांना ही लस देण्यात आली आहे.

अशा प्रकारे राबवणार मोहीम

९ ते १५ महिने वर्षांपर्यंतच्या मुलांना ही एमआर लस देण्यात येणार आहे. शिवाय, अंदाजे १७ लाख ३ हजार २१६ शाळेतील विद्यार्थ्यांना ही लस दिली जाणार आहे. त्यामुळे या मोहिमेची सुरुवात शालेय स्तरावरुन केली जाणार आहे. ही मोहीम २७ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून पुढचे १ ते २ महिने मुंबईत राबवली जाणार आहे. १०० टक्के एमआर लस देणं हे या मोहिमेचं उद्दीष्ट आहे.

” गोवर-रुबेला हे लसीकरण लहान बाळांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या लसीकरणाला आमचा संपूर्णपणे सपोर्ट आहे. हा खूप चांगला उपक्रम असून हे लसीकरण अत्यंत सुरक्षित आहे. मुंबईसह भारतात अनेक केसेस आढळत आहेत. या आजारात पूर्ण शरीराला गोवर येतात. श्वास घ्यायला त्रास होतो. शिवाय, ३ आठवड्यांपेक्षा जास्त गोवरचा त्रास असेल तर कुपोषण, डायरिया होण्याचीही भीती असते. त्यामुळे हे लसीकरण खूप महत्त्वाचं आहे.” डॉ. अर्चना भालेराव – आरोग्य समितीच्या अध्यक्षा

लसीकरणात ऑटो डिस्पोजल सीरींजचा वापर

या लसीकरणात वापरण्यात येणाऱ्या सीरींज( सुई) या ऑटो डिस्पोजल असणार आहेत. एकदा का या सीरींजला ओपन केलं की, त्याला आतमधल्या साईडला ओढलं की, ०.५ डोस इंजेक्शन भरलं की, ते त्या मुलाला टोचलं जाणार आहे. एकदा का मुलाला इंजेक्शन टोचलं की ती सीरींज लॉक होईल. त्यामुळे, या सीरींजचा पुर्नवापर होऊ शकणार नाही. त्यामुळे ही सर्वात सुरक्षित अशी लसीकरण मोहीम असणार आहे. शिवाय, ज्यावेळेस या वॅक्सिन्सच्या बॉक्सची ने-आण होईल तेव्हा त्यांना बर्फामध्ये पॅक करुन ठेवलं जाणार आहे. तर, या कालावधीदरम्यान वॅक्सिनचा सफेद रंग लाल झाला तर ते वॅक्सिन खराब झालं आहे असं समजून वैद्यकीय अधिकारी ते फेकून देतील. ते वापरात घेणार नाहीत असेही आदेश देण्यात आले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनी या लसीचा दर्जा प्रमाणित केला आहे. त्यामुळे प्रत्येक मुलाला प्रत्येक वेळी नवीन सीरींजद्वारे ही लस दिली जाणार आहे. त्यामुळे पालकांनी कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता ही लस मुलांना द्यावी असं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे.

First Published on: November 23, 2018 7:00 AM
Exit mobile version