धुळवडीनंतर समुद्रात बुडून ६ जणांचा मृत्यू

धुळवडीनंतर समुद्रात बुडून ६ जणांचा मृत्यू

बुडून मृत्यू

धुळवडीचा सण सगळ्यांसाठीच आनंदाचा आणि उत्साहाचा असतो. पण वसई आणि बदलापूरमधल्या काही कुटुंबांसाठी हा सण दुर्दैवी ठरला आहे. धुळवडीनंतर समुद्रात पोहायला गेलेल्या ९ जणांचा दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये मृत्यू ओढवला आहे. यामुळे वसई आणि बदलापूरमधील त्यांच्या घरी शोककळा पसरली आहे. एकीकडे वसईच्या अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर ५ जणांचा मृत्यू झाला असून दुसरीकडे बदलापूरमध्ये देखील खाडीमध्ये बुडून दोघा तरुणांचा मृत्यू झाला आहे.
अर्नाळा समुद्रात बुडून ५ जणांचा मत्यू

पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले…

वसईतील अर्नाळा समुद्रकिनार्‍यावर बुडून पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. होळीनंतर काही तरुण-तरुणी समुद्रात पोहण्यासाठी उतरले होते. त्यांच्यातील काही जणांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. त्यांना शोधण्याचे प्रयत्न पोलीस, स्थानिक ग्रामस्थ आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून रात्री उशिरापर्यंत केले जात होते.
बुडालेल्यांचा शोध घेण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाची देखील मदत घेण्यात येत आहे, अशी माहिती पालघरच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली आहे. आत्तापर्यंत ५ मृतदेह सापडले असून बुडालेले सर्वजण वसई पश्चिमेकडील रहिवासी आहेत. यामध्ये ३ जण एका कुटुंबातील तर २ जण एका कुटुंबातील आहेत.

मृतांची नावे

निशा कमलेश मौर्या (वय 36 रा. अंबाडी रोड वसई पश्चिम)
प्रशांत कमलेश मौर्य (वय 17 रा.  स्वामी नारायण मंदिर, अंबाडी रोड वसई पश्चिम)
प्रिया कमलेश मौर्य (वय १९ रा.  मानव मंदिर स्वामी नारायण मंदिर, अंबाडी रोड वसई पश्चिम)
कंचन मुकेश गुप्ता (वय 35 रा. गोकुल पार्क, मानव मंदिर, अंबाडी रोड वसई पश्चिम)
शितल दिनेश गुप्ता (वय 32 रा. गोकुल पार्क, मानव मंदिर, अंबाडी रोड वसई पश्चिम)

पनवेलमध्येही एकाचा मृत्यू

मित्रांसोबत पनवेलच्या तलावात पोहोण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पनवेल आय.टी.आय. कॉलेजमध्ये शिकत असलेला धीरत खताते (वय २१, रा. कामोठे) हा आपल्या मित्रांसोबत देवळोली तलावात पोहण्यासाठी गेला होता. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

बदलापुरातही दोघे तरूण बुडाले

बदलापुरातील बॅरेज बंधाऱ्यात दोन तरुण बुडाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. होळी खेळल्यानंतर कल्पेश चौधरी आणि कार्तिक लाडी हे दोन तरुण पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने कल्पेश बुडू लागला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार्तिकही बुडाला. याबाबत माहिती मिळताच कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. संध्याकाळी उशिरापर्यंत शोध घेऊनही या दोन्ही तरुणांचा थांगपत्ता लागला नसल्याची माहिती फायर ऑफिसर रमेश पाटील यांनी दिली.
First Published on: March 21, 2019 9:36 PM
Exit mobile version