लोकसभेपूर्वी राज्यात ५५७ ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी

लोकसभेपूर्वी राज्यात ५५७ ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी

Election

राज्यातील विविध 24 जिल्ह्यांमधील 557 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक, तसेच 82 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागांसाठी 24 मार्च 2019 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी दिली.

एप्रिल 2019 ते जून 2019 या कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांबरोबरच थेट सरपंचपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील मतदान होईल. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे 5 ते 9 मार्च 2019 या कालावधीत स्वीकारली जातील. त्यांची छाननी 11 मार्च 2019 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 13 मार्च 2019 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 24 मार्च 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मात्र सकाळी 7.30 पासून दुपारी केवळ 3.00 पर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 25 मार्च 2019 रोजी होईल.

सार्वत्रिक निवडणूक होणार्‍या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या – ठाणे- 3, रायगड- 20, रत्नागिरी- 11, सिंधुदुर्ग- 4, नाशिक- 48, धुळे- 18, जळगाव- 12, अहमदगनर- 3, नंदुरबार- 5, पुणे- 20, सोलापूर- 8, सातारा- 44, कोल्हापूर- 3, औरंगाबाद- 3, उस्मानाबाद- 2, परभणी- 1, अमरावती- 1, अकोला- 14, वाशीम- 32, बुलढाणा- 2, नागपूर- 2, वर्धा- 298, चंद्रपूर- 1 आणि गडचिरोली- 2. एकूण- 557.

पालघर (जि. पालघर), सिंदखेडराजा आणि लोणार (जि. बुलढाणा) या तीन नगरपरिषदेच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 24 मार्च 2019 रोजी मतदान होणार असून, त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.

First Published on: February 23, 2019 4:47 AM
Exit mobile version