सिद्धार्थ नगरवासीयांनी एईएमएलच्या कर्मचार्‍यांना कोंडले

सिद्धार्थ नगरवासीयांनी एईएमएलच्या कर्मचार्‍यांना कोंडले

अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (एईएमएल)च्या वीज ग्राहकांना कोंडून ठेवण्याचा प्रकार नुकताच चेंबूर येथील कार्यालयात समोर आलेला आहे. एईएमएलने वीज जोडणी पूर्ववत करावी या मागणीसाठी चेंबूरच्या सिद्धार्थ नगरवासीयांचा वीज पुरवठा एईएमएलने गेल्या महिन्यापासून खंडीत केला आहे. त्यामुळेच सिद्धार्थ कॉलनीवासीयांनी अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला कोंडून टाकण्यासाठीचे पाऊल सोमवारी उचलले. पण एईएमएलकडून चालू वीज बिल भरून वीज पुरवठ्याचा पर्याय दिल्यानंतरच हे प्रकरण शांत झाले. तब्बल दोन तास १०० कर्मचार्‍यांना एईएमएलच्या ऑफिसमध्ये कोंडून ठेवण्यात आले होते.

सध्या ३२५० वीज ग्राहक हे सिद्धार्थ नगर येथे वीज जोडणीधारक आहेत. त्यापैकी १७०० वीज ग्राहकांनी वीजबिल भरणा केला आहे. पण या परिसरातील वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी किमान २५०० जणांनी वीजबिल भरणा करण्याची गरज आहे असे एईएमएलकडून वीज ग्राहकांना स्पष्ट करण्यात आले आहे. सिद्धार्थ नगरमध्ये काही जणांनी वीज बिलभरणा करूनही मध्यरात्री वीज पुरवठा खंडीत करण्यात येत असल्याचे प्रकार होत असल्यानेच नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

वीजबिलाची थकबाकी असल्यानेच हा वीज पुरवठा खंडीत राहणार असल्याचे अदाणी मुंबई इलेक्ट्रिसिटी लिमिटेडने याआधीच स्पष्ट केले आहे. गेल्या १४ वर्षांपासूनची ७७ कोटी रूपयांची थकबाकी सिद्धार्थ नगरवासीयांकडून एईएमएलला देणे आहे. पण वारंवार विकासकाकडून मिळणार्‍या आश्वासनामुळे आतापर्यंत या परिसराचा वीज पुरवठा खंडीत झाला नव्हता. आतापर्यंत विकासकाकडून केवळ ११ कोटी रूपये भरण्यात आले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मध्यस्ती करूनही याठिकाणचा वीज पुरवठा दोन वर्षांपूर्वी पूर्ववत केला होता.

जुलै महिन्यात ५० लाख रूपये विकासकाकडून भरण्यात आले आहेत. पण थकबाकीचा आकडा हा ७७ कोटी रूपये आहे. सध्या थकबाकीचा विषय बाजूला ठेवत एईएमएलने चालू वीजबिले भरा असे आवाहन सिद्धार्थ नगरवासीयांना केले आहे. चालू वीजबिलेही भरली जात नसल्याने याठिकाणचा वीज पुरवठा सध्या खंडीत करण्यात येत आहे.

First Published on: August 14, 2019 5:10 AM
Exit mobile version