सशस्त्र दलांना अधिक बळकट करण्यास ‘अग्निवीर’ योजना परिणामकारक ठरेल, पंतप्रधानांना विश्वास

सशस्त्र दलांना अधिक बळकट करण्यास ‘अग्निवीर’ योजना परिणामकारक ठरेल, पंतप्रधानांना विश्वास

PM addresses first batch of Agniveers of the three Services via video conferencing on January 16, 2023.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, सोमवारी तिन्ही दलातील प्राथमिक प्रशिक्षण सुरू करणाऱ्या अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीला दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले. आपल्या सशस्त्र दलांना अधिक बळकट करण्यात आणि त्यांना भविष्यासाठी सज्ज करण्यात ही परिवर्तनकारी योजना परिणामकारक ठरेल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

संरक्षण दलाच्या ‘अग्निपथ’ या पथदर्शी योजनेचे बिनीचे शिलेदार झाल्याबद्दल पंतप्रधानांनी अग्निवीरांचे अभिनंदन केले. या युवा अग्निवीरांमुळे भारताचे सशस्त्र दल अधिक उत्साहपूर्ण आणि तंत्रज्ञान स्नेही होईल, असा विश्वासही व्यक्त करून पंतप्रधान म्हणाले की, त्यांच्यातील ऊर्जा सशस्त्र दलांच्या शौर्याचे प्रतिबिंब आहे, ज्याने राष्ट्राचा ध्वज नेहमीच उंच फडकत ठेवला आहे.

आपल्या सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण करून त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच 21व्या शतकात युद्धाच्या स्वरूपात बदल होत असून तांत्रिकदृष्ट्या प्रगत सैनिक आपल्या सशस्त्र दलांमध्ये महत्वाची भूमिका बजावतील. आपल्या युवावर्गाकडे तशी क्षमता आहे आणि म्हणूनच येणाऱ्या काळात आपले अग्निवर सशस्त्र दलांमध्ये प्रमुख भूमिका बजावतील, असे ते म्हणाले.

महिला अग्निवीर आपल्या कामगिरीने ज्या प्रकारे नौदलाची शान वाढवत आहेत. सियाचीनमध्ये तैनात असलेल्या महिला सैनिक आणि आधुनिक लढाऊ विमाने चालवणाऱ्या महिलांची उदाहरणे देत पंतप्रधानांनी विविध आघाड्यांवर महिला सशस्त्र दलांनी कशाप्रकारे नेतृत्व केले आहे, याचे स्मरण पंतप्रधानांनी करून दिले.

सतत बदलते जागतिक पटलावरील चित्र आणि भौगोलिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर आपल्या देशातील संरक्षण दलांना सशक्त करण्याला सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. अशा परिस्थितीत अग्निपथ योजनेमुळे सशस्त्र दलांचा चेहेरा अधिक तरुण आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत जाणकार होईल, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितले.

या योजनेला देशभरातून अत्यंत उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला आणि यातील भरतीसाठी मोठ्या संख्येने अर्ज पाठविण्यात आले, असे सांगून संरक्षणमंत्री म्हणाले, अग्निवीरांना योग्य शिक्षण मिळेल याची खात्री करून घेण्यासाठी संरक्षण मंत्रालय तसेच केंद्रीय शिक्षण मंत्रालय संयुक्तपणे व्यवस्था करत आहेत. सैन्यातील सेवेनंतर स्वयंरोजगार किंवा एखादा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेल्या अग्निवीरांना केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या सहकार्याने किफायतशीर दरात कर्ज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था होत आहे. अग्निवीर हे सुरक्षावीर राहण्याबरोबरच समृद्धीवीरही होतील, राजनाथ सिंह म्हणाले.

First Published on: January 16, 2023 8:39 PM
Exit mobile version