वसई-विरारमधील बेघरांना ‘हँडवॉश स्टेशन’चा आसरा

वसई-विरारमधील बेघरांना ‘हँडवॉश स्टेशन’चा आसरा

वसई-विरारमधील बेघरांना ‘हँडवॉश स्टेशन’चा आसरा

वसई-विरार महापालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी हँडवॉश स्टेशन बसवले आहेत. मात्र, त्यातील अनेकांचे नळ चोरीला गेले असतानाच आता हँडवॉशचा आसरा भिकारी, बेघर आणि गर्दुल्ल्यांनी घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हँडवॉशसाठीचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत.

लाखो रुपये पाण्यात

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना हाताची स्वच्छता करता यावी, यासाठी महापालिकेने आपल्या हद्दीत ५० हॅण्डवॉश स्टेशन बांधण्याचे काम हाती घेतले आहे. त्यातील सात हॅण्डवॉश बांधून तयार झाले आहेत. प्रत्येक हॅण्डवॉश स्टेशनसाठी साडेतीन लाख रुपये खर्च येत आहे. शहरात बनवलेल्या ‘हॅण्डवॉश स्टेशन’चा उद्देश कितपत सफल झाला हे अद्यापसमोर आलेले नाही. मात्र, या ‘हॅण्डवॉश स्टेशन’चा आसरा वसई-विरारमधील भिकारी, बेघर आणि गर्दुल्ले घेत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वसई-विरारमधील नागरिकांनी पालिकेच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

या ‘हँडवॉश स्टेशन’चा नक्कीच चांगला उपयोग होईल, असे मत त्यावेळी महापालिकेचे कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांनी व्यक्त केले होते. साडेतीन लाख रुपये इतक्या कमी खर्चात महापालिका ही ‘हँडवॉश स्टेशन’ बांधत आहे. इतक्या कमी खर्चात काम होत असल्याने नागरिकांकडून चांगला प्रतिसादही येत असल्याची माहितीही त्यांनी दिली होती. कोविडनंतर याचा वापर पाणी पिण्यासाठी केला जाऊ शकतो. तसा तो करता यावा, यासाठी थेट पाण्याचे कनेक्शन त्यात देण्यात आले आहे. शिवाय याच्या स्वच्छता आणि मेंटेंनन्स राखला जावा, यासाठी महापालिका अभियंता, आरोग्य निरीक्षक आणि पाणीपुरवठा कर्मचारी यांना आदेश देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

प्रत्यक्षात मात्र, या ‘हॅण्डवॉश स्टेशन’चा आसरा भिकारी आणि गर्दुल्ले घेत असल्याचे दिसून आले आहे. मध्यंतरी उद्घाटनाआधीच एका ‘हॅण्डवॉश स्टेशन’चे नळ चोरीला गेल्याची छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यामुळे या स्टेशनच्या स्वच्छता आणि मेंटेनन्सविषयी लाड यांनी केलेले दावे किती खोटे आहेत, हे या प्रकारातून उघड झाले आहे.

दरम्यान, कोरोनानंतर हे हॅण्डवॉश स्टेशन पाणपोई म्हणून उपयोगात आणण्याचा महापालिकेचा मानस आहे. मात्र, या हॅण्डवाश स्टेशनचे नियोजन चुकल्याने हा खर्च पाण्यात जाणार असल्याची टीका वसईतील सामजिक कार्यकर्ते तसनीफ नूर शेख यांनी केली आहे.

विशेष म्हणजे वसई-विरार शहरांत बनवण्यात येणार्‍या ‘हॅण्डवॉश स्टेशन’च्या संख्येबाबत खुद्द माजी महापौर प्रवीण शेट्टी यांनाही कल्पना देण्यात आली नव्हती. इतक्या मोठ्या प्रमाणावर महापालिका ‘हॅण्डवॉश स्टेशन’ बनवत असेल तर आयुक्तांनी तेथील जनतेची मते जाणून घेणे अपेक्षित होते. कारण पुढे जाऊन या हॅण्डवॉश स्टेशन’च्या वापर आणि मेंटेनन्सबाबत प्रश्न उभे राहणार आहेत. वसई-विरारमध्ये किती ‘हॅण्डवॉश स्टेशन’ बनणार, याबाबत आपल्याला काहीच कल्पना नाही. हा निर्णय आयुक्तांनी परस्पर घेतला असल्याची खंतही प्रवीण शेट्टी यांनी सुरुवातीला व्यक्त करताना आयुक्तांच्या या कामावर आक्षेपही घेतला होता.

कोविडसारख्या महासंकटात महापालिकेने लाखो रुपयांचा हा खर्च आरोग्य व्यवस्थेवर खर्च करणे अपेक्षित होते. हॅण्डवॉश स्टेशन बांधण्यामागे आयुक्तांचा उद्देश चांगला असला तरी या स्टेशनचा उपयोग असा भिकारी आणि गर्दुल्ले यांना होणार असेल तर भविष्यात या स्टेशनची स्वच्छता आणि मेंटेनन्स कसे राखले जाणार?, असा प्रश्न मनसेचे विरार शहर अध्यक्ष महेश कदम यांनी उपस्थित केला आहे.


हेही वाचा – ठाण्यात घरकाम करणाऱ्या महिला, नाका कामगारांची Antigen test होणार


 

First Published on: July 23, 2020 8:59 PM
Exit mobile version