अपघातासाठी जबाबदार ठरवून बेस्ट चालकाचे अपहरण

अपघातासाठी जबाबदार ठरवून बेस्ट चालकाचे अपहरण

Best Bus

मुंबई:विलेपार्ले येथे पश्चिम द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघातामध्ये बेस्टचा चालक जबाबदार असल्याचा आरोप करत दोन तरुणांनी त्या बस चालकाचे थेट अपहरणच केले. या प्रकरणी पोलिसांनी त्या दोन्ही तरुणांना ताब्यात घेत त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या बसचालकामुळे आमच्या चुलत भावाचा या ठिकाणी अपघात झाल्याचे म्हणणे या तरुणांचे होते.

यश राठोड आणि त्याचा चुलत भाऊ अभिषेक हे दोघे पश्चिम द्रुतगती महामार्गावर दोन वेगवेगळ्या दुचाकींवरुन प्रवास करत होते. त्यावेळी यश हा अभिषेकच्या दुचाकीच्या मागून जात होता. अंधेरी फ्लायओव्हरवर पोहोचल्यावर खड्ड्यांमुळे अभिषेकचा तोल गेला आणि अपघात झाला. अभिषेकसोबत त्याच्या मागे असणारा मित्र दोघेही लांब फेकले गेले. अपघातात दोघेही जखमी झाले.

यावेळी बेस्ट बस त्याच मार्गाने चालली होती. बसमध्ये आणि अभिषेकच्या स्कूटरमध्ये जास्त अंतर नव्हते. बराच वेळ झाला तरी आपला भाऊ आपल्या मागून येत नाही, असे पाहून यश पुन्हा मागे आला असता घटनास्थळी अपघातात अभिषेक जखमी झाल्याचे त्याला पाहायला मिळाले. मागून येणारी बेस्ट बससुद्धा त्याच वेळी घटनास्थळी पोहोचली होती. त्यामुळे या अपघाताला बेस्ट चालकालाच जबाबदार ठरवत त्याला यश राठोड याने चुलत भाऊ अभिषेक आणि त्याच्या मित्राला रुग्णालयात दाखल करण्यासाठी सोबत येण्यास जबरदस्ती केली.

चालक सहजासहजी यायला तयार नसल्याने यशने जबरदस्तीने चालकाला रिक्षात बसवले आणि तो पळून जावू नये म्हणून बांधून ठेवले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकारानंतर दुसर्‍या दिवशी बस चालकाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार दोन्ही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेवून कोर्टात हजर केले होते. तसेच दोन्ही जखमींची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

खड्डयामुळे झालेल्या अपघाताला बस चालकच जबाबदार आहे, असे समजून या दोन तरुणांनी मिळून चालकाला रिक्षात बांधून ठेवले होते. चालकाने तक्रार दाखल करताच आम्ही दोघांनाही अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
-लक्ष्मण चव्हाण,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विलेपार्ले पोलीस स्टेशन

First Published on: October 3, 2018 1:41 AM
Exit mobile version