निम्म्या नाहीत, भाजप शिवसेनेला फक्त १०० ते ११० जागा देणार?

निम्म्या नाहीत, भाजप शिवसेनेला फक्त १०० ते ११० जागा देणार?

केडीएमसीत शिवसेना आणि भाजपमध्ये चुरशीची निवडणूक

लोकसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर विधानसभा निवडणुकीतही मोठा विजय मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना युती पुढे सरसावली आहे, असे चित्र सध्या राज्यात निघालेल्या यात्रांमधून दिसत आहे. मात्र ‘जागावाटप आणि मुख्यमंत्रीपदाबाबत आमचं ठरलंय’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वारंवार सांगत असले तरी भाजप मित्रपक्ष शिवसेनेला १०० ते ११० पेक्षा जास्त जागा सोडायला तयार नसल्याचे खात्रीलायकरित्या समजते.
लोकसभेनंतर आमचा युतीचा फॉर्म्युला ठरला आहे, असे सांगणार्‍या भाजप-शिवसेना नेत्यांमध्ये अद्यापही जागावाटपाबाबत एकमत झाालेले नाही, अशी सूत्रांची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी भाजप आणि शिवसेना यांनी युती केली होती.

सेना-भाजप युती ही राज्यातली सर्वात जुनी युती असली तरी त्यामधले तणाव जगजाहीर आहेत. एवढेच नाही तर शिवसेनेला किती जागा द्यायच्या याबाबत भाजपचे राज्यातील आणि केंद्रीय पातळीवरील नेतृत्वात एकमत नाही. त्यामुळेच पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागील आठवड्यात जागावाटपाबाबत लवकरात लवकर निर्णय घ्या, असे आदेश दिले आहेत. शिवसेनेला २८८ पैकी फक्त एक तृतीयांश जागाच द्याव्यात, अशी राज्यातल्या भाजप नेत्यांची भूमिका आहे. अगदीच आग्रह झाला आणि केंद्राकडून हस्तक्षेप झाला, तर जास्तीत जास्त १०० ते 1१० जागा शिवसेनेसाठी सोडण्यास भाजप तयार आहे.

भाजपच्या फॉर्म्युलानुसार भाजपचे विद्यमान 122 आमदार आणि शिवसेनेचे 63 आमदार सोडून आणि चार मित्रपक्षांना 10 जागा सोडून ज्या जागा उरतात त्या समसमान वाटून घ्याव्यात. त्यामुळे शिवसेना-भाजप युतीचे 185 आणि मित्रपक्षांना 10 अशा मिळून 195 जागांचे वाटप झाल्यानंतर उरलेल्या 93 जागांमध्ये शिवसेनेला 47 आणि भाजपला 46 जागा देण्यात याव्यात अशा सूत्रावर भाजप असल्याचे खात्रीलायकरित्या समजते. त्यामुळे शिवसेनेचे 63 आमदारांच्या जागा आणि वाट्याला येणार्‍या 47 जागा मिळून 110 जागा शिवसेनेच्या वाट्याला येतील.मात्र शिवसेना यासाठी कदापी तयार होणार नाही. शिवसेनेला २८८ पैकी निम्म्या जागा म्हणजे 144 जागा, अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद आणि मंत्रिमंडळात समसमान खातेवाटप हवे आहे. यासाठी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना शिवसेनेकडून पुढे आणले जात असून, नुकतीच आदित्य यांनीं उत्तर महाराष्ट्रात जनआशीर्वाद यात्रा काढली होती. शिवसेना युतीसाठी तयार असली तरी भाजपच्या मनात मात्र तसे दिसत नाही आणि शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आणि जुनेजाणते पदाधिकारी हीच भावना खासगीत बोलून दाखवत आहेत. विधानसभा निवडणुकीला जेमतेम 50 दिवस उरले असताना २८८ पैकी कुठल्या जागा परस्परांना सोडायच्या यावर अजून अंतिम निर्णय झालेला नाही. भाजप महाजनादेश आणि शिवसेना जनआशीर्वाद आणि माऊली संवाद यात्रेच्या निमित्ताने वेगवेगळ्या मार्गाने राज्यातील जनतेशी संवाद साधत आहेत.

याचवेळी भाजपने २८८ मतदारसंघांची चाचपणी नव्हे तर छुपी तयारीही सुरू केली आहे. युती तुटल्यास वेगळे लढण्याची भाजपची तयारी असून त्याची झलक त्यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत दाखवली होती. 2014 मध्ये भाजपने निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण याची घोषणा केली नव्हती. उलट राज्यातले मुख्यमंत्र्यांच्या जवळचे नेते मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरच निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. मीच मुख्यमंत्री होणार, असे स्वतः फडणवीस यांनी देखील यापूर्वीच जाहीरपणे म्हटले आहे. त्यामुळे युतीचा पेच सुटण्याची चिन्हे सिध्या तरी दिसत नाहीत.

First Published on: August 25, 2019 5:14 AM
Exit mobile version